चुकलं असेल तर धर्मा पाटील यांना व्याजासह मोबदला देऊ : बावनकुळे
एबीपी माझा वेब टीम | 29 Jan 2018 10:45 AM (IST)
या प्रकरणाचा अहवाल सात दिवसात येईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नागपूर : ''मंत्रालयात विषप्राशन केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यू झाल्यानंतर सरकार खडबडून जागं झालं आहे. त्यांच्या जमीन संपादनाच्या बाबतीत चूक झाली असेल तर त्यांना व्याजासह मोबदला देऊ. या प्रकरणाचा अहवाल सात दिवसात येईल,'' अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. धर्मा पाटील यांचा मृत्यू झाल्यानंतर सरकार जागं झालं आणि नागपुरात पत्रकार परिषद घेऊन बावनकुळे यांनी मदतीचं आश्वासन दिलं. धर्मा पाटील यांच्या मुलांशी बोलून सरकार तुमच्या पाठीशी असल्याचं त्यांना सांगितलं असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. ''2009 ते 2015 या काळात जो अन्याय झाला, तो आता होणार नाही. या प्रकरणात जातीने लक्ष घातलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना जमिनिचं पुनर्मूल्यांकन करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. मंगळवापर्यंत हा अहवाल येईल. त्यानतंर सर्व शेतकऱ्यांना 10 लाख रुपये प्रती हेक्टरने मोबदला देता येईल का, याबाबतही विचार केला जाईल,'' असं बावनकुळे म्हणाले. इतर शेतकऱ्यांना जास्त मोबदला मिळाला आणि आपल्याला कमी, असा धर्मा पाटील यांच्या मुलांचा आक्षेप आहे. त्याचीही चौकशी केली जाईल, असं आश्वासन बावनकुळे यांनी दिलं. आपल्याला न्याय मिळावा यासाठी मंत्रालयाच्या दारात विष पिणाऱ्या धर्मा पाटील यांचा अखेर मृत्यू झाला. काल रात्री त्यांचं निधन झालं. 22 जानेवारीला विषप्राशन केल्यापासून त्यांच्यावर मुंबईतल्या जेजे रुग्णालयात उपचार सुरु होते. काय आहे संपूर्ण प्रकरण? धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यात रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली.