मुंबई : मंत्रालयात विष प्राशन केलेले 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली आहे. पाटील यांनी जेजे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.


संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं. त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन वेळा धर्मा पाटील यांचं डायलिसीस करण्यात आलं होतं.

धर्मा पाटील यांचे प्राण वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले होते, मात्र ते अपयशी ठरले.

धर्मा पाटलांच्या मुलाने अवयवदानाचा अर्ज भरला होता. त्यानुसार निकामी न झालेले अवयव दान करण्यात येतील.

जमिनीचा योग्य मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमिपुत्र शेतकरीचा दर्जा देण्याचं आश्वासन सरकार लेखी स्वरुपात देणार नाही, तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यात रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली.
भाजप सरकार हे कडेलोट करण्याच्या लायकीचं: राजू शेट्टी

धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला.

इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं.

धर्मा पाटलांच्या विषप्राशनानंतर जाग आलेल्या सरकारनं पाटील यांच्या कुटुंबियांना 15 लाखाचं सामुग्रह अनुदान देऊ केलं. मात्र अनुदान नको, आम्हाला मोबदला द्या, अशी मागणी लावून पाटील कुटुंबाने धरली आहे.
संबंधित बातम्या :

धर्मा पाटलांची प्रकृती चिंताजनक, अवयवदानाचा अर्ज भरला

15 लाखांचं अनुदान धर्मा पाटलांच्या मुलाने नाकारलं

मंत्रालयात 80 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर