पुणे : महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला, तर विरोधी आमदारांची संख्या 150 होईल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार पुण्यातील बारामतीच्या कन्हेरीत प्रचारसभेत बोलत होते.


भाजपच्या डोक्यात सत्ता भिनल्याने त्यांचे सर्वच मित्रपक्ष नाराज आहेत. सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना काहीच अधिकार नसल्याने महापालिका निवडणुकीनंतर सरकार राहिल की नाही याबाबत संभ्रम असल्याचं अजित पवार म्हणाले.

शिवसेना मंत्र्यांच्या राजीनाम्याची तारीख ठरली?

अजित पवार म्हणाले की, "सरकार राहिल की जाईल अशी अवस्था आहे. आज शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तर जवळपास 150 आमदार त्यांच्याविरोधात जातील. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि डावे पक्ष, जे कधीच भाजप-शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाला समर्थन न करणारे. अशी आमची सगळ्यांची संख्या 150 आणि त्यांची संख्या 138.  138 आणि 150, कसं सरकार टिकेल?"

त्यामुळे राज्याच्या सरकारमधून शिवसेनेने पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादीही सरकारला समर्थन देणार नाही, असंच अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेना मंत्र्यांच्या राजीनाम्याची तारीख ठरली?


दरम्यान, खिशात राजीनामा घेऊन फिरणाऱ्या शिवसेना मंत्र्यांच्या राजीनाम्याची तारीख ठरल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 18 फेब्रुवारीच्या मुंबईतील सभेत, शिवसेना मंत्री राजीनामे देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  उद्धव ठाकरेंकडे हे राजीनामे सोपवण्याची चिन्हं आहेत.

राजीनामे खिशात नाहीत, पण आदेश येताच मंत्रिपद सोडू : शिवतारे

मुंबई महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपवर दबाव टाकण्यासाठी आणि मतदारांमध्ये संदेश देण्यासाठी शिवसेना ही खेळी करण्याच्या तयारीत आहे.