कल्याणमधील उद्योगपतीचा अपहृत चिमुकला थेट लातूरमध्ये सापडला!
एबीपी माझा वेब टीम | 09 Feb 2017 02:18 PM (IST)
लातूर: कल्याणहून गायब झालेला तीन वर्षीचा मुलगा काल थेट लातूर रेल्वे स्थानकात सापडला. मुंबईहून लातूरकडे येणार्या लातूर एक्स्प्रेसमधून हा मुलगा इथवर पोहचल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हा मुलगा लातूर रेल्वे स्थानकावर रडत असल्याचं रेल्वे पोलिसांना दिसून आलं. पण त्याचे कोणीही नातेवाईक न सापडल्यानं त्याला मुलांचा सांभाळ करणाऱ्या एका संस्थेकडे सोपविण्यात आलं आहे. हा मुलगा कल्याणमधील एका उद्योगपतीचा असल्याचं समोर आलं आहे. लातूर रेल्वे स्थानकातील सापडलेला हा तीन वर्षीय मुलगा स्वत:चं नाव यश म्हणून सांगत आहे. हा मुलगा कल्याणच्या एका उद्योगपतीचा असल्याच समोर आलं आहे. घरासमोरून मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार त्यांनी नोंदवली होती. या मुलाचं नेमकं अपहरण कुणी केलं होतं? हे अद्याप समजू शकलेलं नाही. सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.