अकोला : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज युतीसाठी थेट शिवसेनेला साद घातली आहे. ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. भविष्यात आपण शिवसेनेशी युती होऊ शकते. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकदा भेटलोही होतो. मात्र ही चर्चा पुढे गेली नसल्याचं आंबेडकर म्हणाले. आपण शिवसेनेबाबत सकारात्मक आहोत. मात्र, आपल्यासोबत कुणीच लग्न करायला तयार नाही, फक्त फिरवायला तयार असल्याची खंत आंबेडकर यांनी व्यक्त केली. आता प्रकाश आंबेडकर यांच्या मैत्रीच्या प्रस्तावाला शिवसेना काय उत्तर देते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 


आंबेडकरांच्या यातून भविष्यात नव्या समिकरणाची चाचपणी सुरु केल्याचं बोललं जात आहे. सध्या काँग्रेससोबतची आंबेडकरांची आघाडीची चर्चा पुढे जात नसल्याने आंबेडकरांनी मैत्रीसाठी सेनेला चुचकारल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आंबेडकरांनी यातून शिवसेनेला राज्यात नव्या 'शिवशक्ती-भिमशक्ती'च्या समिकरणासाठी साद घातली काय?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 


'विश्वास नांगरे पाटील यांना निलंबित करा'
मुंबईतील शरद पवार यांच्या बंगल्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना निलंबित करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मुंबईचे अतिरिक्त आयुक्त निशित मिश्रा यांनी या हल्ल्याच्या शक्यतेसंदर्भात सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांना एक पत्र लिहिलं होतंय. या पत्राचं काय झालंय असा सवाल आंबेडकरांनी विचारला आहे. तसंच या हल्ल्याची चौकशी नांगरे पाटलांकडून काढून घेण्याची मागणी आंबेडकरांनी केली आहे. 


राज ठाकरेंवर कठोर कारवाईची मागणी
राज ठाकरेंनी काल (12 एप्रिल) ठाण्यात केलेल्या मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात केलेल्या भडकाऊ भाषणावर आंबेडकरांनी टीका केली आहे. हनुमान चालीसा ज्याला म्हणायची, गायची आहे, तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, राज ठाकरेंनी मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा पठणाची भूमिका दंगल घडवण्याची असल्याचं आंबेडकर म्हणाले. गृहमंत्र्यांनी वेळ न दडवता राज ठाकरेवर कारवाई करावी. मात्र, राज्य सरकार यासाठी जाणीवपूर्वक कारवाईसाठी वेळ लावत असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे.  


वीजप्रश्न सोडवता येत नसेल तर सरकारने राजीनामा द्यावा
राज्यावरचं वीज संकट हे सरकारचं अपयश असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. सरकारला हा प्रश्न सोडवता येत नसेल तर राजीनामा देत नव्या सरकारकडे प्रश्न सोपवावा, असा टोला आंबेडकरांनी लगावला. मंत्र्यांचे बंगले वाढत असतांना महावितरणचे खिसे खाली कसे होतात?, असा प्रश्न विचारत आंबेडकरांनी भारनियमनाच्या मुद्द्यावर ऊर्जामंत्री नितीन राऊंतांना टोला लगावला आहे.


'एसटी कर्मचाऱ्यांनी विनाअट कामावरु रुजू व्हाव'
एसटी कामगारांनी विनाअट आता कामावर रुजू व्हावं. एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन होऊ शकत नाही. मात्र, बाकी मागण्यासंदर्भात आम्ही एसटी कामगारांसोबत असल्याचं आंबेडकर म्हणाले. या संदर्भात गुणरत्न सदावर्तेंनी एसटीचं आंदोलन भरकटवल्याचं आंबेडकर म्हणाले. 


शिक्षण पूर्ण करण्यासाठी सुजात आंबेडकर इंग्लंडला जाणार
सुजात आंबेडकर आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी लवकरच इंग्लंडमध्ये जाणार आहेत. तूर्तास त्यांचं लक्ष अभ्यासाकडे असून ते राजकारणत येण्याबाबतचा निर्णय भविष्यात होईल. सुजात यांच्या अलिकडच्या राजकीय भूमिकासंदर्भात त्यांनी आपल्याशी कधीच चर्चा केली नसल्याचं आंबेडकर म्हणाले. 


उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकी पैशांचा वारेमाप वापर
दरम्यान, कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत पैशांचा वारेमाप वापर झाल्याचा खळबळजनक आरोप आंबेडकर यांनी केला आहे. एका मतासाठी 3 ते 8 हजारांची बोली लागल्याचं ते म्हणाले. जास्त पैसे खर्च करणारा उमेदवारच निवडून येणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.