जळगाव : भारतीय जनता पक्ष मी सोडलेला नाही तर पक्षाने मला बाहेर ढकलून दिले आहे. भाजपमध्ये असताना माझा खूप छळ झाला, किती अपमान झाला तरीही मला पक्ष सोडायचा नव्हता. परंतु त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की शेवटी मला पक्ष सोडावा लागला आणि मी बहुजन समाजाच्या या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची युती होऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे शक्यच नव्हतं. कुणालाही याबाबत शक्यता वाटत नसताना मात्र शरद पवारांनी हे करून दाखवलं, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं.


देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील कितीही सांगत असले की, सरकार दोन महिन्यात पडेल चार महिन्यात पडेल. एक वर्ष झालं तरी सरकार पडत नाही. भारतीय जनता पक्षाचं एकूण संख्याबळ हे 105 असून बहुमतासाठी त्यांना 40 आमदारांची आवश्यकता आहे. म्हणजे कुठला तरी पक्ष त्यांच्यासोबत गेला पाहिजे. परंतु तिन्ही पक्षांपैकी कुठलाही पक्ष हा भाजपसोबत जाण्यास तयार नाही, असंही खडसे यांनी म्हटलं.


भांडण होतील, मतभेद होतील परंतु पाच वर्ष हे सरकार टिकणार


भांडण होतील, मतभेद होतील परंतु पाच वर्ष हे सरकार टिकणार आहे. बत्तीस पक्षाचं सरकार हे अटल बिहारी वाजपेयी यांनी पाच वर्ष चालवलं आहे, हे तर तीन पक्षाचं सरकार आहे. अरे हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे हे मला कळलं म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. भाजपला भीती आहे की आपले 105 आमदारांचे कमी होऊ नये म्हणून आपले आमदार हे दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून त्यांना टिकवण्यासाठी फक्त त्यांना लहान मुलांसारखे आश्वासन सुरू आहे, असं खडसे म्हणाले.


आपल्याला पक्ष वाढवायचा असेल तर संघटित होऊन काम करावे लागेल. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि नगर परिषद, ग्रामपंचायत निवडणुका आणि संघटना बांधणीसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मह्त्वपूर्ण आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी एकनाथ खडसे बोलत होते. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.


संबंधित बातम्या