सोलापूर : मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे. त्यामुळे मला काहीही अडचण येत नाही. ज्या काही राजकीय गोष्टी होत आहेत त्या वेगळ्या आहेत मात्र शिक्षण खाते चालवत असताना राज्यपालांशी संबंध येत असतो. त्यांचे आणि माझे संबंध चांगले आहेत, असं मत उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. एकीकडे राज्यसरकार आणि राज्यपाल यांच्यात जणू संघर्ष असल्यासाऱखे प्रसंग घडत असताना उच्च आणि शिक्षणमंत्री यांनी सोलापुरात हे मत व्यक्त केले आहे.


राज्यपाल भगत कोश्यारी यांच्याशी शिक्षणमंत्री म्हणून आपले कसे संबंध आहेत असा प्रश्न पत्रकारांनी सामंत यांना विचारला होता त्यावर बोलताना सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान विमानाच्या मुद्यावरुन झालेल्या वादावर बोलताना सामंत यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका देखील केली. 'राज्य सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष नाहीये. नियमांचा काही मुद्दा असेल. या नियमांची मला माहिती नाही. मात्र सर्वजण नियमाने वागतील. राज्यपाल देखील नियमानुसार 12 आमदारांच्या नावाच्या शिफारसीवर सही करतील', अशी अप्रत्यक्ष टीका उदय सामंत यांनी केली.


पालघर दौरा | मी घोषणा नाही करणार, पण...- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात 'उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालय सोलापूर' या कार्यक्रमासाठी उदय सामंत हे शुक्रवारी सोलापुरात आले होते. या वेळी विद्यापीठात विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी आदी घटकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. या कार्यक्रमानंतर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. या वेळी विविध मुद्यावर उदय सामंत यांनी भाष्य केलं.


महाविद्यालयं सुरु करण्याबाबतचे अधिकार कुलगुरूंना


महाविद्यालयं सुरु करण्याबाबतचे अधिकार संबिधित विद्यापीठाच्या कुलगुरुंना देण्यात आलेले आहेत. कुलगुरुंनी स्थानिक जिल्हाधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन महाविद्यालय सुरु करण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. राज्यात 15 फेब्रुवारी पासून महाविद्यालय सुरु होतील. 50 टक्के विद्यार्थी उपस्थित राहतील. तसेच कोरोनाबाबतच्या सर्व नियमांची काळजी घेत महाविद्यालये सुरु करण्यात यावेत अशा सुचना उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.


सहनशीलतेमुळे राज्य कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर


दरम्यान शिवजयंती (Shivjayanti 2021) साधेपणाने साजरे करण्याबाबतही उदय सामंत यांनी भाष्य केलं. "केवळ यावर्षीची शिवजयंती साधेपणाने साजरी करावी लागणार आहे. मी सिंधूदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. माझ्या जिल्ह्यातील आंगणेवाडीची यात्रा ही सर्वप्रसिद्ध आहे. मात्र ही यात्रा देखील यंदा साधेपणाने साजरी करावी लागली. महाराष्ट्राच्या सहनशीलतेमुळे राज्य कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शिवजयंती देखील जनता साधेपणाने साजरी करेल असा विश्वास आहे." अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.