पुणे : राज्यातील बारावीची परीक्षा  (HSC) उद्यापासून (21 फेब्रुवारी)  सुरु होणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काही नियमावली जाहीर केली आहे. परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना 10 मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे आणि त्यासोबतच परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. अर्धातास आधी परिक्षाकेंद्रावर हजर राहण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या एक दिवसापूर्वी शररद गोसावी (Sharad Gosavi) यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


परीक्षेसाठी एकूण 15 लाख 13 हजार 909  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विज्ञान शाखा: 7, 60, 046, कला शाखा: 3,81, 982,वाणिज्य:  3, 29, 905, वोकेशनल:  37, 226, आय टी आय: 4750 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षेत कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी बोर्डाकडून घेण्यात येणार आहे. 


मार्गदर्शन सूचना कोणत्या?


-परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. 


-विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2024 च्या बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून परीक्षेदरम्यान महत्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये सुट्टी ठेवण्यात आली आहे. 


-मंडळामार्फत प्रसिध्द आणि छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छापलेले केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. 


- परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी १10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 


- या परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. तसेच त्यांनी परिरक्षण केंद्रावरून गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत आणि वितरीत करेपर्यंतचा व्हिडीओ मोर्बाइलमध्ये  काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


- प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्याकरिता आणि उत्तरपत्रिका आणण्याकरिता नेमण्यात आलेल्या सहाय्यक परिरक्षक (रनर) यांनी जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक करण्यात आलेले आहे.


- सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत. 


- मागील वर्षीप्रमाणेच परीक्षेसाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेली आहे.


-लेखी परीक्षेपूर्वी गैरमार्ग प्रकरणी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे. 


- दिव्यांग विद्यार्थ्यांना गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षांसाठी कॅलक्युलेटर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्याने कॅलक्युलेटर स्वतःचा आणावयाचा आहे. 


- कॅलक्युलेटर फक्त कॅलक्युलेटर स्वरूपातीलच असावा. मोबाईल मधील अथवा इतर इलेक्ट्रॉनिक्स साधनांमधील कॅलक्युलेटर वापरता येणार नाही.


इतर महत्वाची बातमी-


Health Tips : पालकांनो, बोर्डाच्या परीक्षेत मुलांना कसा सपोर्ट कराल? मुलाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी पालकांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवा