मुंबई/ पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे (Pune) आज जलमय झाली असून पुण्यातील कित्येक वर्षांचा रेकॉर्ड आजच्य पावसाने तोडला आहे. शहरातील अनेक भागात पाणीच पाणी झालं असून पाण्यातून मार्ग नागरिकांना काढावा लागत आहे. दुसरीकडे मुंबईतही मुसळधार पाऊस (Rain) सुरू असून कल्याण, ठाणे आणि परिसरात पावसाच्या पाण्यामुळे तेथील नद्यांना पूर आला आहे. बदलापूरजवळील उल्हास नदीला पूर आला असून रस्तेही जलमय झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या कर्जत ते कल्याण वाहतूक बंद असून पुणे-मुंबई मध्य रेल्वे मार्गावरील काही महत्त्वाच्या एक्सप्रेस (Railway) गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याहून मुंबईकडे (mumbai) येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. 


पुण्यात पावसामुळे आज जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. पालकमंत्री अजित पवार यांनीही पुण्यातील काही भागांत दौरा करुन पाहणी केली. तर, प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. त्यातच, मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस, मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस आणि पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस आज 25 जुलै रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. तर, उद्या सकाळी पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, पुणे-मुंबई व मुंबई-पुणे येथील प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे. 


उल्हास नदीची पातळी वाढली


मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे, त्याशिवाय हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. हे पाहता मुंबई महापालिका प्रशासनाने  मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या पहिली ते बारावीच्या शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे. तर, मध्य रेल्वेनेही पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील अनेक एक्सप्रेस ट्रेन्स रद्द केल्या आहेत. बदलापूर आणि वांगणी दरम्यान उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीचा अंदाज घेऊन या एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मध्य रेल्वे सांगितले आहे. सध्या कर्जत ते कल्याण वाहतूक बंद आहे. 


कल्याणमध्ये 200 नागरिकांच्या घरात पाणी


कल्याण मधील शिवाजीनगर परिसरामध्ये वालधुनीच्या कडेला असणाऱ्या 200 हून अधिक नागरिकांच्या घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरले आहे. येथील नागरिकांचे स्थलांतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने केले आहे. मात्र, संसार उध्वस्त झाल्याने नागरिक भयभीत झाल्याचं दिसून आलं. 


पुण्यात पाणी जास्त, प्रशासन कमी


पुण्यात जोरदार पाऊस सुरु असून प्रशासन कमी पडत असल्याची टीका भाजपचे नवनिर्वाचित आमदार अमत् गोरखे यांनी केली आहे. येत्या दोन दिवसात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने आणखी तयारी करून पाणी साचण्यामागील नेमके कारणांचा शोध घेऊन ती दूर करण्याची मागणी आमदार गोरखे यांनी केली आहे.


मुंबईहुन-पुण्याकडे जाणाऱ्या या एक्सप्रेस रद्द


डेक्कन क्वीन एक्सप्रेस
प्रगती एक्सप्रेस


आज पुण्याहून-मुंबईकडे जाणाऱ्या या एक्सप्रेस रद्द


 इंटरसिटी एक्सप्रेस


उद्या पुण्याहून-मुंबईकडे जाणाऱ्या या एक्सप्रेस रद्द


डेक्कन एक्स्प्रेस
प्रगती एक्सप्रेस


उद्या मुंबईहुन-पुण्याकडे जाणाऱ्या या एक्सप्रेस रद्द


इंटरसिटी एक्सप्रेस