मुंबई : येत्या काळात पाऊस किती जोरात असेल, याची झलक त्याने आत्ताच दाखवली आहे. मुंबईसह राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अर्ध्या तासाच्या मुसळधार पावसानंतर मुंबईतील हिंदमाता, मलबार हिल भागात पाणी साचल्याचंही पाहायला मिळालं.




ठाणे आणि नवी मुंबईतही विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. हवेत गारवा निर्माण झाल्याने अखेर उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून राज्यात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठाही खंडित झाला होता. मनमाड, धुळे,

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, महाबळेश्वर आणि कोल्हापूरमध्ये चांगला पाऊस झाला. महाबळेश्वरमध्ये तर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दररोज मुसळधार पाऊस होत आहे. यामुळेच वेण्णा नदीला पूरही आला होता.

कोकण

संपूर्ण कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, नागोठणे परिसरात पावसाने हजेरी लावली.

विदर्भ

वर्धा शहरात आज सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जवळपास 20 मिनिट पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामुळे काही वेळ वाहतुकीवर परिणाम झाला. अचानक आलेल्या पावसाने गरमीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.