उस्मानाबाद : अनेक दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने मराठवाड्यात दमदार पुनरागमन केलं आहे. उस्मानाबाद, लातूर, नांदेडसह मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या जिल्ह्यांमध्ये गेल्या 15 वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.




घरांची पडझड तर नॅशनल हायवे पाण्याखाली



उस्मानबाद, लातूर, नांदेड या तीन जिल्ह्यांच्या बहुतेक तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. उस्मानाबादच्या त्रिकोळी गावात अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. तर मुंबई-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेला आहे. उमरगा-लातूर मार्गावरही पाणीच पाणी झालं आहे.



तर उस्मानाबादच्या बेट जवळगा गावात बोअरवेलमधून चक्क आपोआप पाणी येत आहे.



अतिवृष्टीमुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा



लातूरमध्ये विजांच्या कडकडाटासह धुँवाधार पाऊस सुरु आहे. लातुरातील मांजरा नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सावधानतेचा इशारा  देण्यात आला आहे.  याशिवाय साकोळ ,पांढरवाडी, घरणी  हे तिन्ही प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. या प्रकल्पाखाली येणाऱ्या दहा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.



नांदेडमध्ये 221 मिमी पावसाची नोंद



नांदेड जिल्ह्यातील शेवाडी गावात तब्बल 221 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वास्तविक एवढं पर्जन्यमान कोकणात असतं. या पावसामुळे पिकांचा मोठं नुकसान झालं आहे. या गावाला जाणाऱ्या एका छोट्या पुलाच्या दोन फुटांवरुन पाणी जात असल्याने गावात जाणं कठीण झालं आहे.