कोल्हापूर: कोल्हापूर शहरात काल रात्री मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. रात्री साडेबारा वाजता पडलेल्या मुसळधार पावसामुळं उपनगरातील अनेक वाहने जयंती नाल्यात वाहून गेली आहेत. तर पाऊस आणि नाल्याचं पाणी घरात घुसल्यामुळं 40हून अधिक कुटुबांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात काल रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने सर्वांचीच दाणादाण उडाली. पावसाचा जोर रात्री 1 वाजल्यानंतर वाढल्याने, शहरातून जाणाऱ्या जयंती नाल्याचं पाणी रस्त्यावर येण्यास सुरवात झाली. रस्त्यावर 8 फूट पाणी आल्याने 8 चारचाकी, 20 हून अधिक दुचाकी, तर 3 रिक्षा वाहून गेल्या आहेत.



रामानंद नगर, जरगनगर, रेणूका मंदिर परिसर, शास्त्रीनगर या परिसरातील नाल्यामधील पाणी अनेक घरांमध्ये घुसल्याने, या परिसरातील नागरिकांना स्थानिक नागरिकांनी सुखरुप बाहेर काढलं. अनेकांचे प्रापंचिक साहित्य वाहून गेलं. या परिसरात असणाऱ्या अनेक अपार्टमेन्टच्या बेसमेंटमध्ये पाणी घुसल्याने असंख्या गाड्या पाण्यात बुडाल्या.

आज सकाळपासून महापालिक आणि अग्नीशमन दलाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी जाऊन वाहून गेलेल्या गाड्याचा शोध घेण्यास सुरवात केली आहे.