अहमदनगर : पावसाळा सुरू झाल्यामुळे पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची किंवा वीज पडून दुर्घटना झाल्याच्या घटना घडत आहेत. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावातील तीन मुलींचा पाण्यात बुडून (Drowned) मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. गावातील सोमनाथ बढे यांच्या शेतातील अर्धवट काम झालेल्या शेततळ्यात पडून तीन मुलींचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी व गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मुलींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आजपासून राज्यभरातील शाळा सुरू झाल्या असून शाळेच्या पहिल्याच दिवशी अशी दुर्घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 


मेंढवण गावातील सोमनाथ बढे यांच्या खासगी शेततळ्याचं काम सुरू होतं. मात्र, काही कारणास्तव हे काम सध्या बंद असल्याने शेततळं अर्धवटच बांधण्यात आलं होतं. आज शाळेचा पहिलाच दिवस असल्याने शाळा सुटल्यानंतर फिरत फिरत तीन मुली शेततळ्याकडे गेल्या. या शेततळ्यात पावसाचं पाणी साचलं होतं. दुर्दैवाने खेळत असताना पाण्यात बुडून तिन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


अनुष्का बडे (11 वर्ष), सृष्टी ठापसे (13 वर्षे) आणि वैष्णवी जाधव (12 वर्ष) अशी तिन्ही मुलींची नावे आहेत. या तिन्ही मुली मैत्रीण असल्याने शाळा सुटल्यानंतर फिरण्यासाठी शेततळ्याकडे गेल्या होत्या. त्यावेळी, तिन्हीही मुली शेततळ्यात साचलेल्या पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे. 


हेही वाचा


महादेव बेटिंग ॲपप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यास अटक; सामान्य युवकाचा रुबाब, गाड्या, VIP वागणूक होती चर्चेत