जायकवाडीतील पाण्यावर हिरवा तवंग, पाण्याची तपासणी होणार
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 09 Oct 2016 10:05 AM (IST)
औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाण्यावर हिरव्या रंगाचा तवंग पसरल्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र प्रशासनाच्या वतीने नागरिकांना घाबरुन न जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे. जायकवाडी धरणातील जलाशय अवघ्या पाच दिवसात हिरव्या रंगाच्या तवंगाने व्यापला आहे. पाण्यावर 5 चौरस किलोमीटर परिसरात हिरव्या रंगाचा तवंग पसरला आहे. यंदा धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी आलं. प्रथमदर्शनी शेवाळामुळे हा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. आरोग्याचा दृष्टीने जलाशयातील पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार आहे. पाण्याचा हिरवा रंग शेवाळामुळे आहे की एखाद्या केमिकलमुळे याचा शोध घेतला जाईल. मात्र नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, तसंच पाणी पिण्यास कोणताही धोका नसल्याचं प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.