बुलडाणा : सिंचनासाठी बांधण्यात आलेल्या धरणावर अतिक्रमण करुन समाजकल्याण विभागातील कर्मचारी गेल्या 7 वर्षांपासून शेती करतो आहे. तर शेती करण्यासाठी या बहाद्दराने धरणात चक्क 700 ते 800 ट्रॉली माती टाकून मोठ-मोठे बांधही टाकले आणि माती टाकून जेसीबी मशीनच्या सहाय्याने धरणाचे सपाटीकरणही केले आहे.


धरणाचं सपाटीकरण केल्यानं धरणातील पाणी पातळी कमी झाली आहे. परिणामी धरणाच्या शेजारील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसत असल्याने त्यांच्या पिकांचे नुकसान होते आहे. मात्र याविषयी परिसरातील शेतकरी पाटबंधारे विभागाकडे दाद मागून थकले. तरीही पाटबंधारे विभाग डोळ्यांवरील पट्टी काढायला तयार नाही आणि कब्जा करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करायला धजावत नाही. त्यामुळे आता न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे.

मोताळा तालुक्यातील धामणगाव देशमुख येथे पाटबंधारे विभागाचे धरण असून परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करुन हे धरण 25 ते 30 वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. यामध्ये परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीबरोबर समाजकल्याण विभागाचा कर्मचारी अरुण इंगळे आणि त्याचे कुटुंबाचीसुद्धा जमीन याच धरणात संपादित केली गेली होती.

अरुण इंगळेला जमिनीचा मोबदलाही दिला गेला आहे आणि त्याला मिळालेल्या धरणग्रस्ताच्या प्रमाणपत्रावर ते समाजकल्याण विभागात नोकरीवर सुद्धा लागला आहे. मात्र धरण झाल्यावरही धामणगावच्या धरणात अरुण इंगळे आणि त्यांच्या कुटुंबाने धरणात मोठ्या प्रमाणात माती-गाळ आणून टाकला आणि धरणात अतिक्रमण करून मोठं-मोठे बांध टाकले आणि त्यावर शेती करतो आहे.

धरणात माती आणि बांध टाकल्याने परिसरातील असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात ज्यांची शेती धरणात संपादित झाली नसतानाही धरणातील पाणी पातळी कमी झाली आहे आणि यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जातं आहे आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. याविषयी परिसरातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे नव्हे तर सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेक वर्षांपासून न्यायासाठी उंबरठे झिजवले. मात्र, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली आहे आणि त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्याने धरणावर कब्जा करुन मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आहे. धरणाच्या बुडीत क्षेत्रात आणि भिंतीच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत पाटबंधारे विभागाने मागील आठवड्यात आठवड्यात वृक्षारोपण मोहीम राबवून 1200 वृक्षांची लागवड केली. मात्र या बहाद्दराने दुसऱ्या च दिवशी वृक्ष उपटून त्यामध्ये शेती केली आणि सोयाबीन पेरली. याविषयी शेतकऱ्यांनी विभागाकडे तक्रार केली आहे. तरीही काहीच कारवाई नाही. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यां कडूनच वृक्षारोपण कार्यक्रमाला गालबोट लावल्यासारखे आहे.

दरम्यान, ज्याच्यावर हे सर्व आरोप होत आहे, त्या अरुण इंगळेला जेव्हा याबाबत विचारले, तेव्हा त्यांनी आपण धरणात कुठलेच गाळ टाकले नाही, आपले शेत धरणाच्या बुडीत क्षेत्राला लागून आहे, असे सांगितले. मात्र या प्रकरणी संबंधित विभागाची चुप्पीमुळे संबंध धरणाच्या अस्तित्वावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.