भाजपचे माजी खासदार नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार
एबीपी माझा वेब टीम | 22 Feb 2018 06:47 PM (IST)
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.
गोंदिया : गोंदियात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी खासदार आणि सध्या काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पटोलेंनी गोंदियातील देवरी पोलिस स्टेशनमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार केली आहे. पोलिस चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करणार आहेत. गोंदिया जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याने आत्म्हत्या केली नाही, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातव्या राज्यस्तरीय अखिल भारतीय संत साहित्य संमेलनात केलं होतं. प्रत्यक्षात 2017 मध्ये 18, तर 2018 मध्ये तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, असं पटोलेंनी सांगितलं. शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरु असतानाही संतांच्या व्यासपीठावर खोटं बोलून संतांची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.