मनमाड : मनमाड शहरातील अस्थिरोग तज्ञ डॉक्टर फहीम कुरेशी यांनी 23 वर्षीय रुग्णाच्या गुडघ्यावर अतिशय गुंतागुंतीची अशी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया भारतातील पहिली आणि जहातील पाचवी शस्त्रक्रिया ठरली असून जागतिक स्तरावरील आर्थो जनरल मध्ये त्याची नोंद घेण्यात आलीय.


मनमाड शहरातील हे आहेत अस्थिरोग तज्ञ डॉक्टर फहिम कुरेशी त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर ही शस्त्रक्रिया पार पाडली. 23 वर्षाच्या अझर सय्यद या तरुणाचा मोटरसायकल अपघात होऊन त्याच्या डाव्या गुडघ्याची वाटी मासपेशी पासून वेगळी झाली होती. त्यामुळे त्याला पाय उचलता येत नव्हता की चालता येत नव्हते अशा वेळी त्याला डॉक्टर कुरेशींकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करायला सुरुवात केली.


गुडघ्याच्या वाटीवर झालेली दुखापत दुर्मिळ असल्याने शस्त्रक्रियेसाठी त्यांच्याकडे कुठलेही मार्गदर्शन नव्हते अशाही परिस्थितीत अनुभव आणि पायाभूत माहितीच्या आधारावर क्रेकोसुचर तंत्रज्ञानाचा वापर करत गुडघ्याच्या वाटीखालील धागे जोडून फिक्स केले. त्यामुळे वाटी आणि मासपेशी जोडल्या जाऊन ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली.या शस्त्रक्रियेची नोंद जागतिक पातळीवरील जर्नल ऑफ अर्थोपेडीक केस रिपोर्टमध्ये झाली असून अशा स्वरुपाची दुर्मिळ शस्त्रक्रिया देशातील पहिली आणि जगातील पाचवी ठरली आहे.


डॉक्टरांनी केलेल्या या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाकडून त्यांनी नियमित व्यायाम करुन घेतला. त्यामुळे अझर  सय्यद हा आज सर्वसामान्यांप्रमाणे चालू शकतो, मांडी घालून बसू शकतो. डॉक्टर फहिम कुरेशीच्या  शस्त्रक्रियेची दखल जागतिक स्तरावर घेतल्याने शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.