धुळे : एकीकडे सरकार स्थापण्याविषयी मुंबईत राजकीय वादळ सुरु असताना तिकडे धुळ्यात वेगळंच राजकीय वादळ सुरु झालं आहे. भाजपाचे नेते आणि पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांनी पुन्हा निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी एका बैठकीत केली आहे. आपल्या कार्यकर्त्यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेशही दिले आहेत. पुन्हा निवडणूक झाल्यास अगदी थोड्याश्या फरकाने हरलेल्या जागा भाजपा नक्की जिंकेल असा विश्वास रावल यांनी या वेळी व्यक्त केला आहे.


भाजपच्या कार्यकर्त्यांच्या या बैठकीत पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या बैठकीत भाजपतर्फे इच्छुक असलेले उमेदवार देखील उपस्थित होते. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप, नाराजी असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी अधोरेखित करत शिवसेनेचं नांव न घेता शिवसेनेवर टीका केली.

धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी झाली होती. मात्र महायुती झाल्याने जिल्ह्यातील काही जागा सोडाव्या लागल्या आहेत. विशेष म्हणजे धुळे महानगरपालिकेत भाजपची एक हाती सत्ता असतांना, भाजपचे नगरसेवक असतांना धुळे शहराची जागा शिवसेनेला गेली. याविषयी भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आणि म्हणूनच आता आमची तयारी झाली आहे. आमचं ठरलंय , नियोजन आमचं झालंय , संधी मिळाल्यास ते आम्ही सिद्ध करून दाखवू असं मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं.

Jaikumar Rawal | पुन्हा निवडणुका, भाजप स्वबळावर लढणार : जयकुमार रावल | धुळे | ABP Majha


धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात निवडणूक निकालाविषयी कोणीही हरकत घेतलेली नसतांना, शिवाय निवडून आलेले उमेदवार हे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले असतांना भाजप कार्यर्त्यांनी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी हास्यापद असल्याचा सुरु जिल्ह्यात सुरु आहे.