Majha Katta Gaur Gopal Das : 1 जानेवारीपासून आपल्या आयुष्यातील प्रत्येक पान कोरं आहे. त्यामुळं उद्यापासून आयुष्यातील पुस्तकात आपण चांगलं लिहू शकतो असे मत जगप्रसिद्ध व्याख्याते गौर गोपाल दास (Gaur Gopal Das) यांनी व्यक्त केलं. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते गौर गोपाल दास यांनी एबीपी माझा कट्ट्यावर (Majha Katta) हजेरी लावली, यावेळी ते बोलत होते. आपलं आयुष्य हे पुस्तकासारखे आहे. आत्तापर्यंतची वर्ष ही पुस्तकातील धड्यासारखी गेली आहेत. जे गेलं त्याच्याकडे लक्ष देऊन उपयोग नसल्याचे ते म्हणाले. दररोज चांगल्या गोष्टी पाहा, त्यामुळं सकारात्मकता वाढेल असेही ते म्हणाले.


सकारात्मकता येण्यासाठी मेहनत करावी लागते


मनावर आपला ताबा असेल, तर आपल्याला साध्या साध्या गोष्टीत सुद्धा आनंद मिळतो असेही गौर गोपाल दास यांनी सांगितसे. 2023 मध्ये कितीतरी अडचणी असल्या तरी तुमची संगत महत्वाची आहे. ज्यांच्या संगतीने आपल्या आयुष्यात सकारात्मकता वाढेल. मित्र असे हवेत ज्यांना आपल्या अडचणी सांगता याव्यात. ज्यांच्याकडे तुम्हाला मोकळेपणानं बोलता येईल असे गौर गोपाल दास म्हणाले. सकारात्मकता आपोआप येत नाही. त्यासाठी कष्ट करावे लागतात. त्यासाठी निवड करावी लागते असे गौर गोपाल दास म्हणाले. आपल्याला मनाला ट्रेंड करावं लागेल. रोज चांगल्या दोन ते तीन चांगल्या गोष्टी पाहायच्या असेही ते म्हणाले.


 मन मोकळं करण्यासाठी मित्र हवेत


आपल्याला मनातल्या काही गोष्टी बऱ्याच वेळा बाजूला काढून ठेवाव्या लागतात. नाहीतर त्याचे ओझं होतं. आपण मनामध्ये खूप साऱ्या समस्या घेऊन भटकत असतो. कित्येक वेळेला मन खुलं करुन आपल्याला बोलताही येत नाही. बऱ्याच वेळेला आपल्या काही गोष्टी कोणालाच माहित नसतात. मात्र, आपण मन हलकं केलं पाहिजे असे गौर गोपाल दास यांनी सांगितले. नकारात्मकतेकडून जर सकारात्मकता हवी असेल तर आपल्याला तीन चार चांगले मित्र हवेत. त्यांच्याकडे आपण मन मोकळ करुन बोलू शकेल. कारण आपल्या नात्यांमध्ये लोकं फरफेक्ट नसतात. त्यामुळं मित्र हवेत असे गौर गोपाल दास यांनी सांगितले. आपण सतत चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत, त्यामुळं आपल्यावर असणारं प्रेशर कमी होतो असंही त्यांनी सांगितले. 


आपल्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत, तिथे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आई वडील असतील मित्र असतील किंवा जिथे काम करतो तिथे असणारे लोक असतील त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं गौर गोपाल दास यांनी सांगितले.