रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या साऱ्या काळात कोकणातील गणेशोत्सव आणि चाकरमानी हा मुद्दा जोरात चर्चिला गेला. गावी आल्यानंतर क्वॉरंटाईनचे नियम, गणेशोत्सव साजरा करण्यावरची बंधनं, चाकरमान्यांना नोकरी धंदा आणि होणारा खर्च यामुळे चाकरमान्यांची अवस्था अडकित्त्यात अडकलेल्या सुपारीप्रमाणे झाली होती. समस्यांच्या या डोंगरापुढे कोकणातील मुळगावी बाप्पा विराजमान तरी कसा करणार? हाच प्रश्न चाकरमान्यांना पडला होता. त्यावरून काही वेळेला वादचं स्वरूप देखील प्राप्त झाले होते. सोशल मीडियावर तर हा मुद्दा जोरात चर्चिला गेला. सारी परिस्थिती पाहता काहींनी सामंजस्याची देखील भूमिका घेतली. पण, गावी न गेल्यास गणपती आणणार का? गणेशोत्सव साजरा करणार कसा? असे प्रश्न चाकरमान्यांना पडले होते. पण, चाकरमान्यांची हीच समस्या ओळखत रत्नागिरी जिल्ह्यातील टेभ्ये गावानं घेतलेला पुढाकार सर्वांसाठी आदर्श ठरला. कारण, 'ज्या चाकरमान्यांना गावी येत गणेशोत्सव साजरा करणं शक्य नाही, त्यांनी काळजी करण्याचं कोणतेही कारण नाही. तुमच्या घरी बाप्पा विराजमान होईल ही जबाबदारी आमची!' अशी भूमिका या गावानं घेतल्यानं चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला. शिवाय, गावीमधील एकीचे देखील दर्शन झाले.


काय झाला निर्णय?


क्वॉरंटाईनचे नियम पाळत सर्वच चाकरमान्यांना गणेशोत्सव साजरा करणं शक्य नाही. त्यामुळे गावच्या सभेत यावर चर्चा झाली. सर्वांनी ज्या चाकरमान्यांना येणे शक्य नाही. त्यांच्या घरी बाप्पा कशारितीनं विराजमान होईल याचा विचारविनिमय केला. यावेळी शेजारच्या काही लोकांनी गणपती आणण्याची जबाबदारी घेतली. याबाबत चाकरमान्यांना कळवले गेले. त्यांनी देखील या साऱ्या प्रस्तावाला हसतमुखानं संमती दिली. शिवाय, यावेळी होणार खर्च संबंधित व्यक्तिच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय झाला. अशी माहिती टेंभ्य - हातिस ग्रामपंचायतीच्या सरपंट कांचन नागवेकर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली. दरम्यान, ज्या चाकरमान्यांना गावी येणे शक्य होते ते सारे नियम पाळत गावी आले. त्यामुळे गावात कोणतीही समस्या निर्माण झाली नाही. दीड दीवस, पाच दिवस किंवा अगदी सात दिवस देखील चाकरमान्यांच्या बाप्पाची सेवा करण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतल्याची माहिती देखील नागवेकर यांनी दिली. गावानं घेतलेल्या या निर्णयामुळे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळे आनंदाच्या वातावरणात प्रत्येक घरात बाप्पाचं आगमन झाले आहे.

काय आहे स्थानिकांचं म्हणणं?


कोणत्याही कारणास्तव गणेशोत्सवात खंड पडता कामा नये, प्रथा, परंपरा जपल्या पाहिजेत. कोरोना यंदा आहे. पुढील वर्षी नसेल. शिवाय, अशा कठिण प्रसंगी एकमेकाला साथ देणे हा मानव धर्म आहे. त्यामुळे आम्ही या निर्णयाचं स्वागत केले. अशी प्रतिक्रिया रश्मी साळवी यांनी याबाबत बोलताना दिली आहे. गावानं उचललेल्या या पावलांमुळे गावात सर्वांच्या घरी बाप्पा आनंदात विरजमान झाला आहे.