Gadchiroli Naxal गडचिरोली : सहकाऱ्यांची काळजी, त्यांच्याबद्दलची माया हे नैसर्गिक मानवी गुणधर्म प्रत्येकामध्ये कमी अधिक प्रमाणात असतात. मात्र, जर कोणी एका हातातून गोळी आरपार निघाल्यानंतरही आपल्या सहकाऱ्यांसाठी आपला जीव धोक्यात घालून माओवाद्यांच्या (Naxal) बेछूट गोळीबारात सहा तास लढा देत असेल तर त्या व्यक्ती बद्दल तुमच्या काय भावना असणार? गडचिरोली पोलिसांच्या (Gadchiroli Police) सी सिक्सटी(C-60) या कमांडो पथकाचे शंकर पोटावी या जवानांने संकटात अडकलेल्या आपल्या सहकाऱ्यांसाठी असेच अतुलनीय शौर्य गाजवले आहे. 


गोळी हातातून आरपार गेली, तरीही दिला तब्बल सहा तास लढा


छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर बुधवारी 17 जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यातील वांडोली जवळच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक घडली. या पोलीस-नक्षलवादी चकमकीत महाराष्ट्राच्या विशेष दलाच्या C-60 कमांडोंनी 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या भीषण चकमकीत प्रथम नक्षलवाद्यांनी सी- सिक्सटी च्या जवानांवर बेछूट गोळीबार सुरू केला. त्यामुळे चकमकीच्या  पहिल्या काही मिनिटांमध्येच पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील गंभीर जखमी झाले. त्यानंतर पुढील काही मिनिटात विवेक शिंगोळे आणि शंकर पोटावी हे ही जखमी झाले. शंकर पोटावी यांच्या उजव्या हातातून गोळी चक्क आरपार निघाली.


साधारणपणे अशा स्थितीत जखमींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पोलीस अधिकरी आणि C-60 त्यांचे ऑपरेशन मागे घेऊन जखमींना सुरक्षित बाहेर काढते. मात्र, त्या दिवशी हातातून गोळी आरपार होऊनही शंकर पोटावी याने आपल्या सहकाऱ्यांना सोडून सुरक्षित बाहेर जाण्यास नकार दिला आणि जखमी अवस्थेमध्ये ही नक्षलवाद्यांशी पुढील सहा तास लढा सुरू ठेवला. सोबतच आपल्या अनुभवाच्या आधारावर नक्षलवाद्यांचा घेरा तोडून दाखवला.


रक्तरंजित नक्षली चळवळीचं कंबरडं मोडलं!


शंकर पोटावी यांच्या या शौर्यामुळे नक्षलवाद्यांच्या चक्रव्युवहात अडकलेल्या सोबतच्या अनेक जवानांचे जीव तर वाचलेच. शिवाय सोबतच जखमी असलेला आपला एक सहकारी आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून लढतो आहे, हे पाहून सोबतच्या जवानांमध्ये ही नवा जोश निर्माण केला आणि ते सर्व नव्या उत्साहाने नक्षलवाद्यांविरोधात लढले. त्यानंतर अनेक तास दोन्ही बाजूंनी जबरदस्त गोळीबार झाला आणि अखेरीस C-60च्या पथकाने नक्षलवाद्यांच्या तीन कमांडरसह बारा नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. परिणामी नक्षलवाद्यांचे टिपागड दलम आणि चातगाव -कसनसूर दलम कायमचे संपुष्टात येऊन उत्तर गडचिरोली सशस्त्र नक्षलवादापासून मुक्त होऊ शकला आहे. शूरवीर शंकर पोटावी यांच्या शौर्याचे सध्या सर्वत्र कौतुक केलं जातंय. सोबतच संपूर्ण  C-60च्या पथकाच्या अतुलनीय शौर्या रक्तरंजित नक्षली चळवळीचं कंबरडं मोडण्यात आले आहे.