Gadchiroli Naxalism News : गडचिरोलीच्या (Gadchiroli) भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील अतिदुर्गम हिदूर गावात रस्ता बांधकामासाठी असलेले वाहनांची नक्षलवाद्यांनी (Naxal) जाळून टाकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. त्यामुळे  कंत्राटदाराचे मोठे नुकसान झाले आहे. 19 डिसेंबरच्या मध्यरात्री नक्षल्यांनी रस्त्याच्या बांधकामावरील वाहने पेटवली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनास्थळी नक्षल्यांनी काही पत्रके सोडत त्यात 22 डिसेंबर रोजी बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशमधील प्रतिक्रांतिकारी हल्ल्यांविरोधात भारत बंदची हाक दिली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.


चारही वाहन जळून खाक


भामरागडपासून दहा किलोमीटरवर महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगत हिदूर- दोबूर आणि पुढे कोयरकोटी जोडणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. बुधवारी मध्यरात्री नक्षल्यांनी बांधकामस्थळी असलेल्या वाहनांची जाळपोळ करत या विकासकामाल विरोध  केला. यात एक जेसीबी, टँकरचा समावेश आहे. या घटनेमध्ये  चारही वाहन जळून खाक झाली असून कंत्राटदराचे मोठे नुकसान झाले आहे. या रस्त्याच्या कामाला नक्षल्यांचा सुरुवाती पासूनच विरोध हाता. हा भाग नक्षलप्रभावित व संवेदनशील असल्याने येथे कायम नक्षल्यांचे कटकारस्थान सुरू असते. अशीच एक कारवाई 19 डिसेंबरच्या मध्यरात्री नक्षल्यांनी केली. याप्रकरणी माहिती मिळताच गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाची पाहणी केली. 


पत्रातून नक्षल्यांनी दिली भारत बंदची हाक 


पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या पाहणी दरम्यान नक्षल्यांनी तेथे काही पत्रक सोडलेले आढळून आले. या पत्रकात बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशात प्रतिक्रांतिकारी हल्ले वाढल्याने या विरोधात 16 ते 22 डिसेंबर दरम्यान देशव्यापी प्रचार आंदोलन सुरु असल्याचा दावा केला आहे. याचाच एक भाग म्हणून 22 डिसेंबरला नक्षल्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. हा बंद यशस्वी करा असे आवाहन या पत्रातून केले आहे.


रस्ता कामाला होता विरोध


गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील अतिदुर्गम हिदूर हा भाग अतिशय नक्षल प्रभावित व संवेदनशील आहे. नक्षल्यांनी या भागात विकासकामाल कायम विरोध दर्शविला आहे. त्याच प्रमाणे हिदूर भागात सुरू असलेल्या नव्या रस्त्याच्या कामाला नक्षल्यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. हा भाग छत्तीसगड सीमेलगत असल्याने या रस्त्याचे बांधकाम झाल्यानंतर नागरिकांचे अवागमन या मार्गाने वाढेल असते. तसेच अनेक गोपनिय हालचालींवर बंधन आली असती.  या भीतीमुळे हे विकासकाम नक्षल्यांना नको होते. यामुळे नक्षल्यांनी वाहने जाळून या विकासकामाल विरोध दर्शविला आहे.