सांगली: काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरमधील शासकीय निवासस्थानी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात बैठक होऊन एफआरपी अधिक 175 रुपये असा निर्णय झाला. तसेच यावेळी एफआरपीचा 70:30 असा फॉर्म्युलाही निश्चित करण्यात आला होता. मात्र, आता या निर्णयाविरोधात बळीराजा संघटना आक्रमक झाली आहे.


कोल्हापूरच्या बैठकीनंतर जिल्हातील स्थानिक स्थळावर ऊस दरावर तोडगा काढण्याचं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यासाठीच ऊस दराच्या पहिल्या उचलीबाबत सांगलीत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी आणि शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकित कोल्हापुरात जाहीर करण्यात आलेला एफआरपी अधिक 175 हा कोल्हापूरमधील निर्णय जिल्हातील कारखानादार आणि काही संघटनांनी मान्य केला. मात्र, बळीराजा शेतकरी संघटनेने आम्हाला हा निर्णय अमान्य असल्याचे सांगत खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

एफआरपीची घोषणा ही सरकारशी मॅनेज असल्याचा आरोप करत, ऊसाला 3500 रुपये दर देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच या मागणीसाठी सोमवारी बळीराजा संघटना मंत्री सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूर येथील घरासमोर धरणे आंदोलन करेल असेही सांगितले.

कोल्हापूरच्या बैठकीत ऊसाच्या दराबाबत तोडगा निघाला तरी स्थानिक पातळीवरच्या संघटना त्यावर समाधानी नसल्याचे पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

ऊस दरावर अखेर तोडगा, एफआरपी एकरकमी मिळणार

सरकार तुमचंच, मागा चार हजार, अजित पवारांचा शेट्टींना टोला

ऊसाला 3200 रुपयांची पहिली उचल द्या, राजू शेट्टींचा एल्गार