उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत चार जोडप्यांनी निवडून येत इतिहासात घडवला आहे. यंदाचं महापौरपद महिलांसाठी राखीव असल्याने कलानी आणि आयलानी गटात चुरस निर्माण झाली आहे.


उल्हासनगरचे रिपाइं (आठवले) गटाचे जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव आणि त्यांच्या पत्नी अपेक्षा भालेराव, शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्र चौधरी आणि त्यांच्या पत्नी राजश्री चौधरी, शिवसनेचे धनंजय बोडारे आणि त्यांच्या पत्नी वसुधा बोडारे, त्या रविंद्र भुल्लर त्यांच्या पत्नी चरणचीतकौर भुल्लर अशा पती-पत्नीच्या चार जोडप्यांनी महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवत पालिकेत एन्ट्री केली आहे.

Ulhasnagar Municipal result : उल्हासनगर महापालिकेचा अंतिम निकाल


उल्हासनगर महापालिकेच्या एकूण  78 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये भाजपने मोठी मुसंडी मारली आहे, तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपने 78 पैकी 32 जागांवर यश मिळवलं, तर शिवसेनेला 25 जागांवर समाधान मानावं लागलं.

इतर महापालिकांप्रमाणेच भाजपने उल्हासनगरमध्येही सत्ता आणण्यासाठी कंबर कसली होती. भाजपने इथे टीम ओमी कलानीची साथ घेतली होती. अखेर भाजपला या प्रयत्नात यश आलं, असंच म्हणावं लागेल.

उल्हासनगर महापालिकेत यंदाही कलानी आणि आयलानी आहेत. पॅनल 2 मधून ओमी कलानी यांची पत्नी पंचम कलानी निवडून आल्या आहेत. तर पॅनल 5 मधून भाजप जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांच्या पत्नी मीना आयलानी नगरसेविका झाल्या आहेत. यंदाचे महापालिकेचे महापौरपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्यामुळे दोन्ही गटांमध्ये चुरस असणार आहे.

साई पक्षाला सोन्याचा भाव

2007 मध्ये उल्हासनगर महापालिकेत 17 नगरसेवक निवडून आणत साई पक्षाने महापौरपद ताब्यात घेतलं होतं. नंतर पक्षात फूट पडल्याने 2012 मध्ये साई पक्षाचे सातच नगरसेवक निवडून आले. असं असतानाही त्यांनी अडीच वर्ष महापौरपद मिळवलं होतं.

आता पुन्हा शिवसेना आणि भाजपा हे प्रमुख पक्ष बहुमतापासून दूर राहिल्यामुळे 11 नगरसेवक निवडून आणणाऱ्या साई पक्षाला सोन्याचा भाव आला आहे. जो पक्ष शहराच्या विकासासाठी मदत करेल, त्याच्याबरोबर जाऊ, असे संकेत साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी सांगितलं.