Nashik Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency) सत्यजित तांबे यांची उमेदवारी चांगलीच चर्चेत राहिली. तांबे यांच्या अपक्ष धोरणामुळे काँग्रेससह मामा बाळासाहेब थोरात देखील व्यथित आहेत. नुकतेच थोरात यांनी एका कार्यक्रमात सत्यजित तांबे पुन्हा काँग्रेसमध्ये या असं आमंत्रण दिल. मात्र थोरातांच्या या आवाहनाला सत्यजित तांबे यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. 


नाशिक (Nashik) पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे काँग्रेस पक्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. यामुळे काँग्रेस पक्षामधील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आले. ज्यानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आणि त्यांचे वडील सुधीर तांबे यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले. तर नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी झाल्यानंतर सत्यजित यांचे मामा आणि कॉंग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला. बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा देताच काँग्रेसमधील आणखी एक वाद सर्वांच्या समोर आला. 


काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात ((Balasaheb Thorat) यांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये सत्यजित तांबे हे देखील उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले कि, सत्यजितच पक्ष विरूद्ध अपक्ष किती चालतंय हे बघू. तुझ्याशिवाय कॉंग्रेसला आणि कॉंग्रेसमधील तुझ्या टीमला कसं करमणार? असा प्रश्न विचारला. यावर सत्यजित तांबे हे केवळ हसले, मात्र आज सत्यजित तांबे यांनी ट्वीटने उत्तर दिले आहे. सत्यजित तांबे यांचं हे ट्वीट आता चर्चेत आले आहे. या ट्विट मध्ये एक चारोळी असून 'उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी..... घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी', अशा सूचक असणाऱ्या ओळी सत्यजीत तांबे यांच्या ट्विटमध्ये आहेत. त्यामुळे सत्यजीत तांबे हे काँग्रेसमध्ये परतणार कि नाही हे सांगता येणं अवघड झाले आहे. 


बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते?


भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रा आली असताना सत्यजीतने त्यात खूप काम केले. सत्यजीतची टीम राहिली काँग्रेसमध्ये आणि तू एकटा राहिला. आता तुलाही करमणार नाही, त्यांनाही करमणार नाही आणि काँग्रेसलाही करमणार नाही. माझा हात नीट असता तर तांत्रिक चूकही झाली नसती. मी स्वतः नाशिकमध्ये राहिलो असतो, ती चूक होऊ दिली नसती. परंतू या सगळ्यामधून माझ्या मताची दिल्लीने दखल घेतली आहे. काहीही झाले तरी पक्षांतर्गत गोष्टी आम्ही पक्षातच सोडवू, असं वक्तव्य थोरात यांनी संगमनेर येथील जाहीर सभेत केलं.