Raju Shetti on Bhagat Singh Koshyari : राज्यात आल्यापासून वादाची माळ लावून सोडलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून परत बोलावण्याची मागणी केली आहे. राज्यपाल कोश्यारींनी ताळतंत्र सोडलंय, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी राज्यपालांचा समाचार घेतला. 


राजू शेट्टी म्हणाले, राज्यपालांनी कोश्यारींनी ताळतंत्र सोडलं आहे. पहिल्यांदा त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला. त्यानंतर गुजराती लोकांमुळे महाराष्ट्राचा विकास होत असल्याचे वक्तव्य केले. त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा अपमान केला. आता, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यापर्यंत मजल गेली आहे. तेव्हा अशा माणसाला तातडीने बोलावून घ्या. असा माणूस राज्यपाल महाराष्ट्राचा असणं हा आमचा अपमान समजतो. 




शिवाजी महाराज जुन्या युगाचे हिरो 


राज्यपाल बोलताना म्हणाले होते की, आम्ही शाळेत असताना आम्हाला शिक्षक विचारत होते की, तुमचा आवडता हिरो कोण आहे. त्यामुळे कोणाला सुभाषचंद्र भोस, कोणाला महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू आवडायचे. त्यामुळे मला असे वाटते की, तुम्हाला जर कोणी विचारले तुमचे आवडत हिरो कोण आहे. तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. कारण तुम्हाला महाराष्ट्रातचं ते सापडून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाची गोष्ट आहे, मी नवीन युगाची गोष्ट सांगतोय असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. नितीन गडकरीपर्यंत तुम्हाला इथेच भेटून जातील असेही कोश्यारी म्हणाले. 


जोडे काय असतात आणि कसे मारले जातात हे दाखवून देऊ


खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज्यपालांना हटवण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडून अधिकृतपणे केली पाहिजे, अन्यथा जोडे काय असतात आणि ते कसे मारले जातात? हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली असं विधान भाजपच्या प्रवकत्यांनी केलं, हे भाजपला मान्य आहे का? छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी माफी मागितली? हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे. कारण ते भाजपचे सहयोगी आहेत, मुख्यमंत्री आहेत. वीर सावरकरांबद्दल रस्त्यावर उतरले होते, जोडे मारले होते, स्वागत आहे. आता हे जोडे कोणाला मारणार आहात? भाजपच्या प्रवक्त्यांना की राज्यपालांना? मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर दिलं पाहिजे,' असं राऊत यांनी म्हटलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या