मुंबई : देशभरात देण्यात आलेल्या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं विधीमंडळाचं अधिवेशन चौथ्या दिवशीच गुंडाळले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आज विधानसभेत घोषणा केली. अधिवेशन संस्थगित करण्यासाठी सर्व गटनेत्यांच्या बैठक सकाळी साडे दहा वाजता झाली. या बैठकीत विरोधी पक्षानेही या निर्णयाला समर्थन दिले. दुपारी एक वाजता अधिवेशन संस्थगित केल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.


VIDEO | हायअलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळलं | मुंबई | एबीपी माझा



अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि आमदार मुंबईत विधानभवन परिसरात असतात. यामुळं सुरक्षेवर अतिरिक्त ताण येतो. याच पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यासाठी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली. सर्वांशी चर्चा करुन अधिवेशन संपवण्याबाबत निर्णय घेतला गेला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पुलवामातील हल्ल्यानंतर भारतीय वायू सेनेने दहशतवादी अड्डे नष्ट केले. सीमेवर तणावाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. अंतर्गत सुरक्षा अबाधित राखणं महत्वाचं आहे. मुंबई आर्थिक राजधानी असल्याने नेहमीपेक्षा जास्त निगराणी असली पाहिजे. पॅनिक होण्याचं काहीही कारण नाही पण जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, असे ते म्हणाले. आपलं अधिवेशन अजून दोन दिवस चाललं असतं पण 6 हजारांचं पोलीस बळ याठिकाणी तैनात असते. पोलीस प्रशासनाला अधिकच्या फोर्सची गरज असल्याचं कालच्या बैठकीत निदर्शनास आलं. काल सुरक्षा आढावा बैठकीनंतर सर्वपक्षीय गट नेत्यांनी विचार केला आणि एकमताने अधिवेशन आटोपतं घ्यावं याचा निर्णय घेतला. अतिरिक्त पोलीस बळ रिलीज करून इतर सुरक्षा व्यवस्थेसाठी उपलब्ध करून देण्याचा दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. कुठल्याही पॅनिकची स्थिती नाही हे पुन्हा स्पष्ट करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सभागृहाचे कामकाज संस्थगित करण्याच्या प्रस्तावाला आमचा पाठिंबा आहे, असे यावेळी  विरोधी पक्षनेते विखे पाटील म्हणाले. माय भूमीवरच्या संकटाला तोंड देण्यासाठी आपल्यात एकजूटता असणं गरजेचं आहे. सध्या सीमेवरच्या परिस्थितीनुसार भविष्यात काय होईल याचा अंदाज येणं कठीण आहे. सीमेवर लढत असलेल्या जवानांच्या पाठीशी संपूर्ण, देश खंबीरपणे उभा हाच संदेश आम्हाला द्यायचा आहे, असे ते म्हणाले.