मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने मुंबई वगळता राज्यातील 42 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने तीन दिवसांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. या बैठकीत पुणे, यवतमाळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडायला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीत काही जागांवरून वादाची शक्यता निर्माण झाली आहे.

या बैठकीत लातूर मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे 51 जणांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा गड असलेल्या बारामती मतदारसंघात 13 जणांनी उमेदवारीची इच्छा दर्शविली आहे.

यवतमाळ लोकसभा मतदार संघात माणिकराव ठाकरे आणि मुलगा राहुल माणिकराव ठाकरे यांनी उमेदवारी मिळावी यासाठी मागणी केली आहे तर माणिकराव ठाकरे यांसह माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी देखील यवतमाळमधून उमेदवारीसाठी मागणी केली आहे. यवतमाळ लोकसभा मतदार संघ कोणत्याही परिस्थितीत एनसीपीला द्यायचा नाही अशी आक्रमक भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत घेतली.

नागपूर लोकसभा मतदार संघ आढावा बैठकीला माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी पाठ फिरवली असून मुत्तेमवार ऐवजी अन्य उमेदवार द्यावा अशी मागणी काँग्रेस बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी केली. नागपुरमधून विकास ठाकरे, राजेंद्र मुळक, प्रफुल्ल गुडदे पाटील, प्राचार्य बबन तायवडे यांची नावे समोर आली आहेत.

तर इकडे नगर मतदारसंघात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुलगा सुजय पाटीलसाठी फिल्डिंग लावली आहे. नगर मतदारसंघ राष्ट्रवादीकडून घेऊन सुजय विखे-पाटीलला उमेदवारी द्यावी यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील आग्रही आहेत.




पुणे, यवतमाळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. बैठकीत पहिल्या दोन दिवसात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत पुणे मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यास विरोध करण्यात आला.


पुण्यातून माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवलकर, अनंत गाडगीळ, अभय छाडेज आदी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. नाशिक ,जळगाव आणि रावेरची जागा राष्ट्रवादीकडून परत घेण्याची मागणी बैठकीत करण्यात आली आहे.