रत्नागिरी : शिकाऱ्याच्या फासकीत अडकून रत्नागिरीत बिबट्याला प्राण गमवावे लागले. तारेतून निसटता न आल्यामुळे भुकेने व्याकूळ होऊन बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.


चिपळूण तालुक्यात कामथे सुकाई मंदिर परिसरात झाडाला बारीक तार बांधण्यात आली होती. भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या या तारेच्या फासकीत अडकला. शरीराभोवती बसलेला तारेचा पिळ त्याला सोडवता येत नव्हता.

बिबट्या सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वन विभागाला याची माहिती दिली. तारेचा पिळ त्याच्या शरीराभोवती घट्ट बसला होता. त्यातच तो भूकेने व्याकूळ झाला होता. यामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.

आठ वर्षांचा पूर्ण वाढलेला हा नर बिबट्या होता. त्याची लांबी 200 सेंटीमीटर तर उंची 70 सेंटीमीटर इतकी होती.

गेल्या आठवड्यात अवनी वाघीणीला ठाक केल्यानंतर प्राणीप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर चंद्रपुरात कालच वाघाच्या तीन बछड्यांचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यानंतर घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.