मुंबई विमानतळावरील डागडुजीमुळे अनेक उड्डाणं रद्द
एबीपी माझा वेब टीम | 18 Oct 2016 08:30 AM (IST)
मुंबई : मुंबई विमानतळावरील अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन धावपट्ट्यांच्या डागडुजीचं काम करण्यात येणार असल्यानं जवळपास 2100 उड्डाणं रद्द होणार आहेत. आजपासून सुरु होणाऱ्या डागडुजीचं काम 28 नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. 18, 20, 24 आणि 27 ऑक्टोबर त्याचप्रमाणं 3, 7, 14, 17, 21, 24 आणि 28 नोव्हेंबर या दिवशी प्रामुख्यानं डागडुजीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या १२ दिवसांत अनेक उड्डाणं रद्द केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान मुंबईतून होणाऱ्या उड्डाणांवर याचा परिणाम होणार आहे. दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या 12 दिवसांत प्रतिदिवशी 175 उड्डाणं रद्द होतील असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र नेमकी कोणती उड्डाणं रद्द होणार आणि कोणत्या उड्डाणांच्या वेळेत बदल केले जाणार याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.