उस्मानाबाद/अकोला : गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल व्हायला हवा, असं म्हणत राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.


"एवढ्या वयस्क माणसाने हे करणं योग्य नाही. कायदे खूप आहेत या देशामध्ये. कोणावरही कायद्याने कारवाई करता येते. कोणाच्याही अंगावर हात टाकण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा," असं पांडुरंग फुंडकर म्हणाले.

विठ्ठल पाटलांवर अद्याप गुन्हा नाहीच
कॉलेज कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी तीन दिवस उलटल्यानंतरही विठ्ठल पाटील यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

वडिलांवर गुन्हा दाखल करायला गृहराज्यमंत्र्यांना मुहूर्त मिळेना?

पोलिसांच्या तपासात कोणताही हस्तक्षेप करणार नाही आणि तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई केली जाईल, असं आश्वासन खरं तर रणजित पाटलांनी दिलं होतं. मात्र अजूनही विठ्ठल पाटलांवर साधा गुन्हाही दाखल झालेला नाही.

मुर्तिजापूर पोलिसांनी अद्याप प्रकरणाचा तपासही केलेला नाही, त्यामुळे पोलिस प्रशासन कसला मुहूर्त शोधत आहे, की गृहराज्यमंत्र्यांच्या पिताश्रींना पाठीशी घातलं जात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.

काय आहे प्रकरण?
गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या वडिलांनी कॉलेज कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील भाऊसाहेब देशमुख या कॉलेजमध्ये हा प्रकार घडला.

वडिलांची कॉलेज कर्मचाऱ्याला श्रीमुखात, रणजीत पाटलांनी मौन सोडलं

देशमुख कुटुंबीयांच्या संस्थेचं हे कॉलेज आहे. रणजीत पाटलांच्या कुटुंबीयांमध्ये आणि देशमुख कुटुंबात 2010 पासून वाद सुरु आहे. मंगरुळतांबे गावात रणजीत पाटलांचं कॉलेज आहे. पण या भाऊसाहेब देशमुख कॉलेजमुळे विद्यार्थी रणजीत पाटलांच्या कॉलेजमध्ये जात नाहीत, असं बोललं जातं.

दोन्ही कुटुंबांमध्ये 2010 पासून कायदेशीर लढाई सुरु आहे. रणजीत पाटलांचे वडील आणि दोन वेळा आमदार राहिलेले विठ्ठल पाटील यांनी 2013 साली या कॉलेजची मान्यता रद्द करण्याची मागणी केली होती.

या कॉलेजची मान्यता रद्द करण्यात आली. मात्र देशमुख कुटुंबीयांनी पुन्हा मान्यता मिळवली. आता पुन्हा या कॉलेजची मान्यता रद्द करण्यात आली आहे. पण तरीही कॉलेज सुरु असल्यामुळे विठ्ठल पाटील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन कॉलेजमध्ये गेले. यावेळी कॉलेजच्या शिपायाला त्यांनी मारहाण केली. शिवाय शिवीगाळही केली.

गृहराज्यमंत्री रणजीत पाटलांच्या वडिलांची कॉलेज कर्मचाऱ्याला मारहाण

मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी विठ्ठल पाटील यांच्याविरोधात मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र दोन वेळा आमदार राहिलेल्या विठ्ठल पाटील यांना कॉलेज कर्मचाऱ्याला मारहाण करणं शोभतं का, असा सवाल केला जात आहे.