मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीचा अंतिम निर्णय उद्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातच होईल, असं शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'ने म्हटलं आहे. 26 जानेवारी रोजी गोरेगाव येथे शिवसेनेचा मेळावा होणार आहे. यावेळी होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं असून युतीचा निर्णय उद्याच होईल, असं वृत्त 'सामना'ने दिलं आहे.


उद्याच होणार युतीचा फैसला! -सामनाची हेडलाईन

''राज्याच्या राजकारणाचेच लक्ष आता ‘युती’भोवती केंद्रित झाले असून अंदाज, आडाखे बांधले जात आहेत आणि आकडय़ांचे खेळही रंगात आले आहेत. ‘२६ तारखेलाच ठरणार आर या पार’ असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केल्यानंतर आज दिवसभर प्रसारमाध्यमांपासून राजकीय पक्षांपर्यंत एकच चर्चा रंगली होती… शिवसेना-भाजप युती होणार की नाही? २६ जानेवारी रोजी गोरेगाव येथे शिवसेनेचा मेळावा होणार आहे. त्या मेळाव्यातच युतीचा फैसला होणार असल्याने उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार, काय भूमिका घेणार याकडेच अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यंदाची 26 जानेवारी ही तारीख राज्याच्या राजकारणासाठी खऱ्या अर्थाने ‘स्पेशल’ ठरली आहे हे नक्की!

महापालिका निवडणुकीचे पडघम वाजताच काँग्रेस-राष्ट्रवादीने बोहल्यावर चढण्यापूर्वीच काडीमोड घेतला. काँग्रेसही गटबाजीमुळे दुभंगली. दुसरीकडे शिवसेना-भाजपची युतीसाठी बोलणी होऊ लागली. चर्चेच्या तीन फेऱयाही झाल्या, पण भाजपने दिलेला ११४ जागांचा प्रस्ताव फेटाळतानाच तुम्हाला फक्त ६० जागाच मिळतील अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली. चर्चेला अर्धविराम मिळाला. युतीचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असे ठरले. गेल्या ५ वर्षांत मुंबईत आम्ही भरीव विकासकामे केली आहेत त्यामुळे तुम्हाला आम्ही जागा का वाढवून द्यायच्या, असा रास्त सवाल शिवसेनेने भाजपला केला आहे.

यानंतर ‘युतीचे काय होणार’ याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगू लागली. टॉक शो आणि कट्टय़ावर एकच सवाल विचारला जाऊ लागला. उद्धव ठाकरे यांनाही एका पत्रकाराने ‘युतीची चर्चा कुठपर्यंत आली आहे’ असे विचारले असता ‘युतीची चर्चा माझ्यापर्यंत तरी आलेली नाही’ अशी मिश्कील टिप्पणी करून उद्धव ठाकरे यांनी ‘युती’तील रहस्याला अधिकच हवा दिली होती. त्यामुळे केवळ प्रसारमाध्यमेच नव्हे तर राज्याच्या राजकारणाचेच लक्ष आता ‘युती’भोवती केंद्रित झाले असून अंदाज, आडाखे बांधले जात आहेत आणि आकड्यांचे खेळही रंगात आले आहेत.

 शिवसेना नेते आणि विभागप्रमुखांची बैठक

‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली असल्याचा मेसेज प्रसारमाध्यमांच्या मोबाईलवर फॉरवर्ड होऊ लागला आणि मग सगळ्यांची आज एकच धावपळ उडाली. वृत्तवाहिन्यांच्या ओबी व्हॅन्सचा कलानगरला गराडा पडला. शिवसेना नेत्यांच्या बैठकीनंतर विभागप्रमुखांचीही बैठक झाली. तब्बल दोन तास या बैठका सुरू होत्या. त्यामुळे काहीतरी ‘ब्रेकिंग न्यूज’ मिळणार या आशेवर असलेल्या चॅनेलवाल्यांनी शिवसेना नेत्यांना प्रतिक्रियेसाठी गाठले. प्रश्नांची सरबत्ती झाली. पण सर्व नेत्यांचे एकच सांगणे होते… ‘उद्धव ठाकरेच 26 तारखेला सर्व काही सांगतील!’… ‘युती’चे रहस्य आणखीनच गडद झाले आहे. आणि उद्धव ठाकरे स्वतःच हा रहस्यभेद करणार आहेत!!''