सोलापूर :  परतीच्या पावसाने  महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहे. राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती देखील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहे. तात्काळ मदत जाहीर करा म्हणून शेतकऱ्यांनी मंत्र्यांची गाडी अडवली असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.


संभाजीराजे छत्रपती म्हणाले की,  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, कालपासून मी पंढरपुरातून दौरा सुरू केला आहे. आज मराठवाड्यात काही भागांना भेट देतोय. शेतकऱ्यांना मदत करणे खूप गरजेचे आहे. 50 हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली, तेच माझं देखील आहे.  मान्य आहे सरकार आर्थिक संकटात आहे, सगळं बरोबर असलं तरी आता बळीराजाला मदत द्यावीच लागेल. केंद्र सरकार असो वा राज्य सरकार दोन्ही सरकारने मिळून शेतकऱ्यांना उभारी दिली पाहिजे. तात्काळ मदत जाहीर करा म्हणून शेतकऱ्यांनी मंत्र्यांची गाडी अडवली असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, असं ते म्हणाले.


शेतकऱ्यांवर दीर्घकाळ परिणाम करणारं अस्मानी संकट, मदतीसाठी पंतप्रधानांना भेटणार : शरद पवार


खासदार संभाजीराजे छत्रपती यांची तुळजापूरजवळ स्वतःची देखील शेती आहे, त्याचंही मोठं नुकसान झालं आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या ओला दुष्काळ पाहणी दौरा दरम्यान तामलवाडी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली.



त्यांनी म्हटलं की, कालपासून हा दौरा चालू आहे. मी ही परिस्थिती पाहून दुःखी आहे. सरकारने काहीतरी ठोस मदत द्यावी. शेतकऱ्यांनी जर आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले तर याला लोकप्रतिनिधी जबाबदार असतील, असंही ते म्हणाले.


LIVE UPDATE बांधावर नेते | शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वपक्षीय नेते दौऱ्यावर


मंत्री विजय वडेट्टीवार यांचा ताफा अडवला
मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी  नेत्यांना काही ठिकाणी अडवले जात आहे.   नांदेडमध्ये असाच प्रकार आज घडला. पाहणी दौरे बंद करा म्हणत शेतकऱ्यांनी मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा ताफा अडवला. मदत पुनर्वसन मंत्र्यांचा ताफा अडवत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. पाहणी दौरे बंद करून तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मुखेड तालुक्यातील सलगरा इथं ही घटना घडली. यावेळी मंत्र्यांना निवेदनाद्वारे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली.



पवार, फडणवीसांसह काही नेते शेतकऱ्यांच्या बांधावर, 'मुख्यमंत्र्यांना घर सुटेना!' भाजपचा आरोप