मुंबई : गेल्या चार पाच दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र घराबाहेर पडत नसल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.


शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंचा दौरा
मराठवाड्यातील शेतकरी ओल्या दुष्काळाच्या झळा सोसतोय. या पार्श्वभूमीवर शरद पवार उद्यापासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. तर आज सकाळी सात वाजल्यापासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती व इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करत आहेत.अजित पवारांच्या दौऱ्याच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे यांनी देखील बारामतीच्या नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा सुरू केला आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून ते बारामती तालुक्यातील कर्हावागज यानंतर जळगाव क.प. येथील नुसकानग्रस्त भागाची पाहणी करून ते जेजुरी त्यानंतर पुरंदर, हवेली या भागांची पाहणी करणार आहेत. काल सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यातील विविध भागांचा दौरा करून दौंड तालुक्यातील ही नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर आज त्या बारामती पुरंदर आणि हवेली या गावांच्या दौऱ्यावर आहेत.


अतिवृष्टी भागात तीन दिवस देवेंद्र फडणवीस करणार दौरा
शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे  19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा दौरा करणार आहेत. 19 ला ते बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी, 20 रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्‍या दिवशी  21 रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील.


उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख आज दुपारी 1 वाजता जिल्ह्यात दाखल झाले. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या येणेगूर या गावांच्या शिवारातल्या महामार्गालगतच्या शेताची त्यांनी पाहणी केली.


राजा घराच्या बाहेर आला पाहिजे- रावसाहेब दानवे
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री महोदय आम्ही म्हणतो घराच्या बाहेर निघा. तर हे म्हणतात माझं कुटुंब माझी जबाबदारी.  एकट्यालाच खातो की काय कोरोना, अशा शब्दात दानवेंनी टीका केली आहे. ते म्हणाले, या स्थितीत देवेंद्र फडणवीस  महाराष्ट्रात फिरले. मागच्या वर्षी बांधावर गेले. राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, लोकांत गेला पाहिजे. हे आपलं माझं कुटूंब माझी जबाबदारी आहे, असं दानवे म्हणाले. आमच्या काळात मोबाईल  नेहमी व्हायब्रेट करायचा. काही तरी मदतीचा sms यायचा. आता लोक मोबाईल उघडून पाहातो आणि खिशात ठेवतो, असंही दानवे म्हणाले.


मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करावा- प्रकाश आंबेडकर


राज्यात परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी अक्षरश मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. यासोबतच आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांनी झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना त्वरित मदत  देण्याची मागणीही आंबेडकर यांनी केली आहे.


परतीच्या पावसाचा फटका


अन्नदात्याला पूर्णपणे वार्‍यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे. कोकणात धान, मराठवाड्यात सोयाबीन, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीन, कपाशी, ज्वारी, धान अशा पिकांना मोठा फटका बसला आहे.  रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, तसेच विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, नांदेडमध्ये सोयाबीन पीकांना कोंब फुटली आहेत. तर सोलापूर, उस्मानाबादमध्ये तर काही ठिकाणी सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्याचं दिसलं. अहमदनगर जिल्ह्यात खरिपाचे सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी काढणीला आले असताना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे.