बुलडाणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकीकडे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर तूर विकली असेल, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करु, असे सांगत आहेत. तर दुसरीकडे बाजार समितीचे संचालकच खुलेआम तूर खरेदी करुन स्वत:चा फायदा करुन घेतला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सुधाकर ढोले या शेतकऱ्याने माहितीच्या अधिकाराचा वापर करुन हा प्रकार उघड केला आहे.


बुलडाणा जिल्ह्याच्या शेगाव नाफेड केंद्रावर तूर खरेदी सुरु आहे. पण खरेदीच्या रजिस्टरमध्ये ज्यांच्याकडे जमिनीचा एक साधा तुकडा नाही. त्यांनी शेकडो क्विंटल तूर विकल्याचं माहितीच्या अधिकारातून समोर आलं आहे.

संचालकांनी तर 10 क्विंटलवर 250 क्विंटल तूर विकली आहे. यामध्ये शेतकऱ्याच्या नावावर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी गटातून निवडून आलेल्या काही बड्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर मलिदा लाटल्याचा आरोप ढोले यांनी केला आहे.

पण बाजार समितीचे संचालक शेषराव पहुरकर यांनी हे आरोप फेटाळून लावत, टोकन देण्यासाठी सत्ताधारी गटाच्या नेत्यांकडून लॉबिंग होत असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, याची जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार दिल्याने या प्रकारणाला गंभीर रुप प्राप्त झाले आहे. या दोन्ही तक्रारीच्या चौकशीचे आदेश सहाय्यक निबंधक शेगाव यांना दिले आहेत.

या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी झाल्यास बाजार समिती आणि व्यापारी यांच्या संगन्मतातून शेतकऱ्यांच्या लुटीचे मोठे रॅकेट उघड होऊ शकतं.