कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापणेला तीनशे वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीने 26 किलो सोन्याची पालखी देवीला अर्पण करण्यात आली. हा सोहळा भवानी मंडपात पार पडला.


देशातील प्रमुख तीन पीठांच्या शंकराचार्यांच्या हस्ते पालखी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे हस्तांतरित करण्यात आली. मंदिराच्या देणगीतून ही पालखी तयार करण्यात आली आहे.

या पालखीसाठी 19 हजार भाविकांकडून 26 किलो सोनं देणगी स्वरुपात मिळालं होतं. त्यापैकी प्रभावळ, मोर्चेल आणि चवऱ्या यांसाठी जवळपास साडेतीन किलो सोन्याचा वापर करण्यात आला. तर सुवर्णपालखीसाठी साडेबावीस किलो सोने लागले. या पालखीसाठी आठ कोटींचा खर्च आला.

पालखी सोहळ्याला कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. तसेच या सोहळ्यानिमित्त अंबाबाई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.