स्वत:ची चिता रचून जळगावातील शेतकऱ्याने आयुष्य संपवलं!
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 14 Jun 2016 02:21 AM (IST)
जळगाव : जळगावमध्ये शेतकऱ्याने स्वतःची चिता रचून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नामदेव पाटील असं या 70 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. अमळनेर तालुक्यातील सब गव्हाण गावचे ते रहिवाशी होते. नामदेव पाटील यांनी स्वतःची चिता रचून त्या मध्ये आत्महत्या केल्याचा दुर्दैवी तितकाच धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील सब गव्हाण या गावामध्ये घडला आहे. या घटनेचे कारण स्पष्ट झाले नसले, तरी कर्जबाजारीपणातून ही आत्महत्या केल्याचा नामदेव पाटील यांच्या नातेवैकांचा अंदाज आहे. नामदेव पाटील याना तीन मुले असून, ते आपल्या लहान मुलाकडे राहत होते. परवा रात्री ते गावाला जातो असे सांगून घरातून निघाले होते. मात्र रात्रीच्या वेळेस त्यांच्या शेतात आग लागल्याचे दिसल्याने काही तरुण त्या ठिकाणी पोहोचले असता त्याना हा दुर्दैवी प्रकार दिसला. त्यांनी त्यातील व्यक्ती जळताना पाहून वाचविण्याचा देखील प्रयत्न केला. या घटनेची खबर गावच्या पोलिस पाटलाने पोलिसाना दिली असता पोलिस दप्तरी प्रथन दर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नामदेव पाटील सारण रचून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा आणि नातेवाईकांचा अंदाज आहे. पोलिस आता या घटनेच्या कारणाचा आणि घटनेचा तपास करीत आहे.