मुलीच्या लग्नासाठी हुंडा नाही, लातूरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर | 20 Apr 2017 11:28 AM (IST)
प्रातिनिधिक फोटो
लातूर : मुलीच्या लग्नासाठी हुंडा आणि खर्चाची जमवाजमव होऊ शकत नसल्याने एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील अंबुलगा गावातील ही घटना आहे. अल्प भूधारक शेतकरी शिवराज बाळूराम सूर्यवंशी (वय 45) यांनी स्वतःच्या शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन अत्महत्या केली. मुलीचं लग्न ठरलं होतं. पण हुंडा आणि लग्नातील खर्च याचा मेळ बसत नसल्याने त्यांना काय करावं, हे सूचत नव्हतं, यातूनच त्यांनी आत्महत्या केली. याबाबत औराद शा. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शिवराम सूर्यवंशी यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे. धक्कादायक म्हणजे लातूर जिल्ह्यातच एका मुलीने काही दिवसांपूर्वी हुंड्यासाठी पैसे नसल्याने आत्हत्या केली होती. त्यातच पुन्हा एकदा ही घटना घडली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील हुंड्याची प्रथा कधी थांबेल, असा सवाल केला जात आहे.