मुंबई : नाशिक ते मुंबई असा सुमारे 200 किलोमीटरचा रस्ता पायी कापत शेतकरी मुंबईत पोहोचले आहेत. आपल्या न्याय्य हक्कांसाठी शेतकऱ्यांनी उन्हा-तान्हातून पायातून येणाऱ्या रक्ताचीही पर्वा केली नाहीय. मात्र अशा मोर्चात मोबाईल चार्जिंग संपून घरच्यांशी आपलं संवाद तुटू नये म्हणून एका शेतकऱ्याने अनोखी शक्कल लढवली होती.


नाशिकहून मोर्चात सहभागी झालेल्या नथू उदार या शेतकऱ्याने सोबत मोबाईल घेतला. जेणेकरुन वाटेत घरच्यांशी बोलता येईल. मात्र रस्त्यात आपल्याला मोबाईल चार्जिंग करुन कोण देईल, म्हणून नथू उदार या शेतकऱ्याने थेट डोक्यावरच सोलर पाटी बसवली.



6 मार्च रोजी मोर्चा नाशिकमधून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्त्वात निघाला. म्हणजे गेली सात दिवस शेतकरी उन्हातून पायी रस्ता कापत आहेत. उन्हातून चालताना नथू उदार सोलर पाटी डोक्यावर ठेवतात आणि त्याद्वारे मोबाईल चार्ज करतात.

नथू उदार यांनी केवळ स्वत:चेच मोबाईल नव्हे, तर सोबतच्या मोर्चेकरांचेही मोबाईल त्यांच्या सोलर पाटीमुळे चार्ज होऊ शकले आणि ते घरच्यांशी बोलू शकले.