प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर भिडे गुरुजींचं स्पष्टीकरण
एबीपी माझा वेब टीम | 05 Jan 2018 12:30 PM (IST)
‘प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यावर निराधार आरोप केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनानं या संपूर्ण घटनेची खोलात जाऊन चौकशी करावी.’
सांगली : कोरेगाव-भीमा इथल्या हिंसाचारप्रकरणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजी आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर भिडे गुरुजी यांनी या सर्व प्रकाराबाबत एक पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं आहे. ‘प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यावर निराधार आरोप केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनानं या संपूर्ण घटनेची खोलात जाऊन चौकशी करावी.’ अशी मागणी भिडे गुरुजी यांनी आपल्या पत्रकाच्या माध्यमातून केली आहे. भिडे गुरुजी यांचं स्पष्टीकरण : ‘प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यावर निराधार आरोप करीत अटकेची मागणी केली, याबाबत राज्य सरकारनं कोरेगाव भीमा प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. प्रकाश आंबेडकरांनी अत्यंत निराधार आरोप करुन माझ्यावर अटकेची कारवाई करुन, गुन्हा नोंद करुन, मला याकूब मेमनची वाट दाखवावी अशी मागणी केली. मी आणि माझे कार्यकर्ते आसेतू सारा हिंदुस्थान एकरुप करण्याचा प्रयत्न करीत असताना हे करण्यात आलेले आरोप निराधार आहेत.’ असं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, समस्त हिंदू आघाडीनं देखील एक पत्रक काढून मिलिंद एकबोटे यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. 'मिलिंद एकबोटे हे गेले 15 दिवसात पुण्यातच होते. तसेच्या या दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांकडे धार्मिक कार्ये होती. तिथे ते उपस्थित होते. त्यामुळे कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेशी एकबोटे यांचा काहीही संबंध नाही.' असा दावा या पत्रकात करण्यात आला आहे.