मुंबई : राज्यात एकीकडे तापमानाचा पारा चाळिशी पार जात आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज वादळी वारा, वीजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याच अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.


बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद इत्यादी जिल्हात वादळी वारे, वीजेच्या कडकडाटासह पाउस पडण्याचा अंदाज हवामान खात्यांनं व्यक्त केला आहे. शेतकरी, नागरिकांनी दुपारी 3 ते 7 या वेळेत शेतीचे कामे करु नये, असा सल्ला हवामान खात्यानं दिला आहे. तर पाऊस, वीज चमकत असताना उघड्यावर, झाडाखाली, पाण्याचा स्त्रोत असलेल्या ठिकाणाजवळ जाऊ नये. तसेच विजेच्या खांबाला जनावरे बांधू नये, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.


यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, 'स्कायमेट'चा अंदाज


यंदा दीर्घ कालावधीत सरासरीच्या केवळ 93 टक्केच पाऊस पडणार आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशामध्ये सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज खासगी वेधशाळा स्कायमेटने वर्तवला आहे. आधीच महाराष्ट्रातील 151 तालुके दुष्काळात होरपळत असताना स्कायमेटनं यावर्षीच्या पावसाबद्दल वर्तवलेलं भाकीतने सर्वांचीच चिंता वाढली आहे.


यंदा सरासरी पावसाच्या 93 टक्के पाऊस तर जुलैमध्ये सरासरीच्या 91 टक्के पावसाची शक्यता स्कायमेटच्या अहवालात वर्तवण्यात आली आहे. भारतात सरासरी 289 मिमी पाऊस होतो, तर यंदा फक्त 263 मिमी पाऊस होईल अशी भीती स्कायमेटनं वर्तवली आहे.