राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारा आजकाल त्यांना झोप का येत नाही. त्यांची झोप दिल्लीमधील तिहार जेलमध्ये अडकली आहे. मला सगळंच सांगायचं नाही, पण जो आत गेला आहे, तो काही बोलला, तर काय होईल? याची चिंता त्यांना सतावत आहे. सगळं सत्य समोर येईल तो दिवस लांब नाही, असं सूचक वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलं.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर नरेंद्र मोदींनी पुन्हा टीका केली. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे पाकिस्तानच्या कटाचा भाग अशी टीका केली. काँग्रेसचा जाहीरनामा शरद पवारांना तरी मान्य आहे का? असा सवाल मोदींनी विचारला. याशिवाय शहरी नक्षलवादाला काँग्रेस समर्थन देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मोदींनी आपल्या सभेत काँग्रेसचा जाहीरनामा, सर्जिकल स्ट्राईक, आघाडी सरकारच्या चुकांचा पाढा गिरवला. मात्र गोंदियातल्या समस्यांवर, शेतकऱ्यांवर चकार शब्द काढला नाही.
घराणेशाहीला संपुष्टात आणण्याचा विडा उचलल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. पाच वर्षे यूपीए सरकारच्या चुका सुधारण्यातच गेली, असं सांगत तुमच्या सहकार्याने विकासाचा नवा हायवे तयार करण्याचं आश्वासनही मोदींनी दिली.
लोकांचं भलं होतं आहे आणि आपली मलाई जात आहे, याची चिंता काँग्रेसला सतावत असल्याचा टोला मोदींनी लगावला
'लोक बालाकोट विसरले, असा दावा केला जात आहे. मात्र देश अजून 1962 चं युद्ध विसरलेला नाही तर बालाकोट कसा विसरेल? असा प्रतिप्रश्न मोदींनी विचारला. काँग्रेसकडून संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केला.