अहमदनगर : जनतेतून सरपंच निवडण्याच्या निर्णयानंतर सरकारने आता त्यांना अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. कारण राज्यातील 7 हजार 300 सरपंचाना प्रशिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.


केंद्र सरकार पंचायत राजची दिशा ठरवण्याचा अभ्यासक्रम तयार करत आहे. या सरपंचांची परीक्षा घेण्यात येणार असून उत्तीर्ण सरपंचांना सह्यांचा अधिकार आणि चेक मिळणार असल्याचं, आदर्श ग्राम योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी सांगितलं.

अहमदनगरमधील गाव कारभारी परिषदेत पोपटराव पवार बोलत होते. नगर तालुका पत्रकार संघ आणि मार्केट यार्डच्या वतीने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी बोलताना पवार यांनी सरपंचाना प्रशिक्षण दिल्यास विकास कामं करण्यास मदत होणार असल्याचं म्हटलं. ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात थेट निधी मिळत असल्याने सरपंचाला महत्त्व आल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी पाणलोटसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याचं सांगितलं. तसंच गेल्या 40 वर्षात पाणलोटसाठी 1300 कोटी मिळाले, मात्र तीन वर्षांत 5 हजार कोटी मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.

त्याचबरोबर निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च वाढला असून मतदारांनी विकासकामांना महत्त्व देण्याचं अवाहन पोपटराव पवार यांनी केलं आहे. आमदाराच्या निवडणुकीसाठी पाच ते दहा कोटी आणि खासदाराच्या निवडणुकीसाठी 25 कोटी लागत आहेत. मात्र विकासाला महत्त्व न दिल्यास आणि 4 वाजेपर्यंत मतदार घराबाहेर पडला नाही तर विकासकामं कशी होतील, असा प्रश्नही त्यांनी विचारला.