मुंबई : लोकसभा निवडणुकीत केवळ 48 मतांनी विजयी झालेल्या रवींद्र वायकर यांच्या मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात ईव्हीएमध्ये (EVM) घोळ झाल्याचा आरोप विरोधी पक्षातील काही नेत्यांनी केला आहे. तसेच, अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांच्याकडून यासंदर्भात अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी या प्रकरणात रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या मेव्हण्याची एंट्री झाल्याने आणखी गोंधळ निर्माण झाला आहे. ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल हा रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याच्या हाती असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्यानंतर, विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे, अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर यांच्यातील लढत पुन्हा एकदा चर्चेत आली. त्यावर, आता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे. ईव्हीएम हे स्वतंत्र डिव्हाईस असून त्याला कुठलीही मोबाईल कनेक्टीव्हीटी नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. 


मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाल्यानंतर सुरू असलेला वाद अजूनही कायम आहे. आता या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणात वनराई  पोलिसांकडून निवडणूक मतमोजणी प्रक्रियेतील डेटा ऑफरेटरकडून तपास सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. तर, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. त्यातच, ट्विटरचे प्रमुख आणि टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांनीही ट्विट करुन ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे, राजकीय नेत्यांनी पुन्हा एकदा उत्तर-पश्चिम मतदारसंघातील विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यानंतर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. 


डेटा कम्पॅलेशन सिस्टीम आणि ईव्हीएम वेगवेगळं आहे. ईव्हीएमशी डेटा कम्पॅलेशन सिस्टीमद्वारे केवळ वेबसाईटवर डेटा टाकला जातो, त्याच्याशी संबंधित काही ओटीपी मोबाईलवर येतो, त्यासाठी काही मोबाईल होते, त्यापैकीच एक म्हणजे डेटा ऑपरेटर गुरव यांच्याकडेही मोबाईल होता, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली. तसेच, ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, त्याला कुठलीही वायर किंवा वायरलेस कनेक्टीव्हीटी नसते. ईव्हीएम प्रोग्रामेबल नसून ईव्हीएमचा ओटीपी नसतो, ते स्वतंत्र आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली. मोबाईल असणं हा वेगळा भाग आहे, मोबाईलचा ईव्हीएमशी कुठलाही संबंध नसल्याचेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. 


मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाला नाही


''मी आयोगाच्या सूचनांप्रमाणेच निवडणूक मतमोजणीच्या सर्व प्रक्रियेचं पालन केलं आहे. मी मतमोजणी संपल्यानंतर 7.53 वाजता मी निकाल जाहीर केला. त्यानंतर, 8 वाजून 06 मिनिटांनी किर्तीकर यांचा अर्ज आला आहे. मी अंतिम निकाल जाहीर केल्यानंतर 2 मिनिटं थांबायचं अशी प्रक्रिया असते. मी दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबले होते. त्यामुळे, मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाला असं म्हणणचं चुकीचं आहे.'', असे स्पष्टीकरण निवडणूक अधिकारी सूर्यवंशी यांनी दिले.  तसेच, सध्या, ईव्हीएम हे कस्टडीत आहेत, न्यायालयाच्या आदेशाशिवाय ते आम्हालाही बघता येणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. 


डेटा ऑपरेटर गुरवची चौकशी सुरू


गुरव आमचा डेटा ऑफरेटर आहे, हा जो गोंधळ झाला तो त्या आमच्या कर्मचारी गुरवमुळे झाला असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. मतमोजणी आणि हे मोबाईल प्रकरण पूर्णपणे वेगळं आहे, असेही वंदना सूर्यवंशी यांनी सांगितले. 



नेमकं काय घडलं होतं, आरोप काय?


गोरेगाव नेस्को मतमोजणी केंद्रावर 4 जूनला रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकर हे दोघेही उपस्थित होते. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी झाल्यानंतर  इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवलेल्या पोस्टल बॅलेटची  मोजणी करण्यात आली. ही पोस्टल बॅलेट सिस्टीम अनलॉक करण्यासाठी दिनेश गुरव याने ज्या मोबाईलवर ओटीपी पाठवला होता, तोच फोन मंगेश पंडीलकरच्या हातात होता. ईव्हीएम यंत्रांतील मतांची मोजणी सुरु असताना अमोल कीर्तिकर आघाडीवर होते, त्यांच्याकडे जवळपास 2000  इतके मताधिक्य होते.  मात्र, इलेक्ट्रॉनिक बॅलेट सिस्टीममधील मतांची मोजणी सुरु झाल्यावर रवींद्र वायकर आघाडीवर गेले आणि कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला.


काय आहे प्रकरण


यासंदर्भात वनराई पोलिसांनी वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता, पोलीस तपासात पंडीलकर ईव्हीएम यंत्राशी जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 


पोलिसांचं म्हणणं काय?


या सगळ्या प्रकरणावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामप्यारे राजभर यांनी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही मंगेश पंडीलकर ज्या फोनवर बोलत होता, तो फोन तपासणीसाठी पाठवला आहे. या फोनमधील कॉल रेकॉर्डसची तपासणी केली जाईल. या मोबाईल फोनचा वापर अन्य कोणत्या कारणासाठी झाला का, हेदेखील पाहिले जाईल. आम्ही इतर उमेदवारांचे जबाब नोंदवले असून मंगेश पंडीलकर आणि दिनेश गुरव यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या दोघांनाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावे लागेल. ते दोघेजणही आम्हाला सहकार्य करत आहेत. त्यांनी सहकार्य करण्याचे थांबवल्यास दोघांविरोधात अटक वॉरंट जारी केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.