मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगाने नवा मार्ग शोधून काढला आहे. 'सैराट' चित्रपटातील आर्ची-परशा अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर निवडणूक आयोगाचे ब्रँड अॅम्बेसेडर असतील.


सैराटमधले आर्ची आणि परशा पुन्हा एकदा फोटो आणि बॅनरवर झळकणार आहेत. मात्र यावेळी निमित्त चित्रपटाचं नसून निवडणुकीचं आहे. आगामी निवडणुकांमध्ये मतदान करण्याचं आवाहन आर्ची-परशा करणार आहेत.

महाराष्ट्रातील तरुणवर्ग मतदार नोंदणी आणि मतदान प्रक्रियेत मागे पडत आहे. तीन टक्के तरुणाईपैकी फक्त 1.1 टक्के जण मतदार प्रक्रियेत सहभागी होतात. हा टक्का वाढवण्यासाठी आणि भावी मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाने ही शक्कल लढवली आहे.

आम्ही दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि त्यांच्या टीमशी संपर्क साधला, त्यानंतर दोघांना ब्रँड अॅम्बेसेडर करण्यास ते राजी झाले, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

राज्यात 8.34 कोटी मतदार असून त्यापैकी 12.16 लाख नोंदणीकृत तरुण मतदार आहेत. गेल्या काही वर्षांत मतदार नोंदणीत वाढ झाली असली, तरी ही संख्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.