नवी दिल्ली : यंदाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) दिल्लीत पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर ‘सरहद’ या संस्थेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मात्र, या पुरस्काराने राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले. या पुरस्कारावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आक्षेप नोंदवत साहित्य संमेलनाला दलालांचे संमेलन संबोधले होते. हा पुरस्कार सोहळा साहित्य महामंडळाच्या परवानगीशिवाय झाल्याची माहिती समोर येत आहे.  

Continues below advertisement

साहित्य महामंडळाच्या घटनात्मक तरतुदींनुसार, संमेलन वा संमेलनपूर्व कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजक संस्थेने महामंडळाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु, सरहद संस्थेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करताना तशी परवानगी घेतली नसल्याची माहिती मिळत आहे. यामुळे महामंडळाच्या घटनात्मक तरतुदींना तडा गेल्याची संतापजनक प्रतिक्रिया साहित्यविश्वात उमटत आहे.

काय म्हणाले संमेलनाच्या आयोजक? 

याबाबत साहित्य संमेलनाच्या आयोजक संजय नहार म्हणाले की, साहित्य महामंडळाची घटना काय आहे. याबाबत त्यांचे पदाधिकारी सांगू शकतील. संमेलनाच्या निमित्ताने जे उपक्रम करायचे असतात. त्या अंतर्गत या पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिल्ली हे राजकीय व्यासपीठ आहे. महादजी शिंदे हे कवी, लेखक होते ग्वाल्हेर घराणे सुरू करण्यामागे सर्वात मोठी प्रेरणा महादजी शिंदे यांची आहे. त्यामुळे दिल्लीत होणाऱ्या संमेलनात दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे मानणाऱ्या महादजी शिंदे यांचे स्मरण करणे आणि त्यासाठी तो पुरस्कार देण्यात आला. यावर टीका होत आहे. त्यावर सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. मात्र आम्ही चूक केलेली नाही, असं त्यांनी म्हटले आहे. 

Continues below advertisement

राऊतांच्या वक्तव्याचा निषेध 

दरम्यान, संजय राऊत यांनी संमेलनाला दलालांचे संमेलन, असे संबोधल्यानंतर साहित्य महामंडळाची प्रतिक्रिया समोर आली आहे.  महामंडळ अध्यक्षा उषा तांबे यांनी म्हटले आहे की, संजय राऊत यांनी जे विधान केले त्याचा साहित्य महामंडळ म्हणून आम्ही निषेध करतो. संमेलनाला जोडून कार्यक्रम घेताना आयोजक संस्थेने महामंडळाची परवानगी घेतली नव्हती. महामंडळाच्या घटनात्मक तरतुदींच्या सुरक्षेसाठी आम्ही बांधिल आहोत. आयोजकांना याबाबत स्पष्टपणे कळविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

आणखी वाचा 

Sanjay Raut: एकनाथ शिंदेंचा सत्कार अन् कौतुक ठाकरेंना झोंबलं; संजय राऊतांनी शरद पवारांना खडे बोल सुनावले