Tata AirBus Project: टाटा एअरबस प्रकल्प (Tata Airbus Project) राज्याबाहेर गेल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दुसरा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis Government) सरकारवर टीका सुरू झाली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे गुजरात एजंट असल्याची बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. 


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील उद्योगधंदे, महत्वाच्या संस्था गुजरातला स्थलांतरीत करायचे, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे या ध्येयाने केंद्रातील मोदी सरकार गेल्या आठ वर्षापासून काम करत आहे. राज्यात सत्ताबद्दलानंतर आलेले शिंदे फडणवीस सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवत असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. एक दिवस हे सरकार मुंबई ही गुजरातला देऊन टाकतील. महाराष्ट्राचे नुकसान करून गुजरातचे हित जोपासणारे शिंदे फडणवीस महाराष्ट्रद्रोही आहेत हे स्पष्ट झाले आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.


नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. देशातील सर्वात जास्त मोठे उद्योग महाराष्ट्रात आहे. गुजरात महाराष्ट्राच्या मागे आहे याचे शल्य पंतप्रधान मोदींना आहे. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प आणि संस्था गुजरातला हलवण्याचा सपाटा लावला आहे. दुर्देवाने यापूर्वीचे फडणवीस आणि आताचे ईडी या दोन्ही सरकारांनी महाराष्ट्राच्या हित डावलून मोदींच्या गुजरातच्या हिताला जास्त महत्व दिले आहे. फडणवीस सरकारच्या काळात मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, पालघर येथील प्रस्तावित मरीन अकादमी, मुंबईतील डायमंड बोर्स अशा अनेक महत्वाचे प्रकल्प गुजरातला गेले.


महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुजरातला प्रकल्प जाणे थांबले होते. त्यामुळेच मोदी शाह यांनी ED चा वापर करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडून गुजरातच्या तालावर नाचणाऱ्या कळसुत्री बाहुल्यांचे सरकार आणले आहे. या सरकारच्या काळात वेदांता फॉक्सकॉनचा दोन लाख कोटी रूपयांचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. बल्क ड्रग पार्क प्रकल्पही राज्याबाहेर गेला. त्यानंतर आता टाटा एअरबसचा 22 हजार कोटी रूपयांचा प्रकल्पही गुजरातला गेला. राज्यात सरकार बदलल्यापासून तीन महिन्यात तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. काही दिवसांपूर्वी टाटा एअरबसचा प्रकल्प राज्यात येणार म्हणून जाहीरपणे सांगणारे राज्याचे उद्योगमंत्री आता निर्लज्जपणे हा प्रकल्प मागील सरकारमुळे राज्याबाहेर गेला असे सांगत आहेत. उदय सामंत हे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहेत की गुजरातचे ? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.


महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प इतर राज्यात जाणे हे दुर्दैवी


टाटा एअर बस सारखा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून इतर राज्यात जाणे ही फार दुर्दैवी परिस्थिती असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. महाराष्ट्रात होणारे असे मोठे प्रकल्प इतर ठिकाणी जात असल्याने राज्यातील तरुणांची रोजगाराची संधी जात आहे. दुर्दैवाने सरकार पातळीवर प्रयत्न होत नसल्याचे थोरात यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: