जळगाव : कोल्हापूर, नाशिकनंतर आता जळगाव जिल्हा परिषदही काबीज करण्यासाठी महाविकासआघाडीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. गेल्या 30 वर्षांपासून भाजपची जळगाव जिल्हा परिषदवर निर्विवाद सत्ता आहे. याच पार्श्वभूमीवर काल(गुरुवार)एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचे मनोमिलन झाल्याचे बोलले जात आहे. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील खडसेंची मनधरणी केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता खडसे हे किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होणार आहे.


विधानसभा निवडणुकांनंतर आता राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरून वातावरण तापलं आहे. जळगाव जिल्हा परिषदेवर एकनाथ खडसेंचं वर्चस्व आहे. तसेच जळगावमध्ये एकनाथ खडसे यांची शिवसेनेला साथ मिळण्याची शक्यता असल्याचं काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटिल यांनी सांगितलं होतं. अशातच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे जळगाव जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यातून जाण्याची शक्यता निर्माण झाली. कदाचित त्यामुळेच इतके गंभीर आरोप होऊनही गिरीश महाजन यांनी नमतं घेत खडसेंशी मनोमिलन केल्याचं बोलल जात आहे. फडणवीस आणि महाजनांमुळे आपलं तिकीट कापलं, असा गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी केला होता. त्यानंतर गिरीश महाजनांनीही एकनाथ खडसेंना थेट आव्हान दिलं होतं. याला काही तास उलटत नाहीत तोच जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले. फक्त एकत्र नाही तर आपल्यात काहीही बेबनाव नसल्याचं खडसे आणि महाजनांनी ठासून सांगितलं आहे.

हेही वाचा - एकनाथ खडसे भविष्यात राज्याच्या विधीमंडळात किंवा दिल्लीत दिसतील, सुधीर मुनगंटीवारांचा दावा

कोल्हापूर, नाशिक पाठोपाठ जळगाव जिल्हा परिषद जाण्याची शक्यता?
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रावादी यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीने भाजपला राज्यातील सत्तेपासून दूर ठेवले. याचीच पुनरावृत्ती आता ही आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही करताना दिसून येत आहे. नाशिक जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने निफाड तालुक्यातील उगाव गटाचे सदस्य शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर हे बिनविरोध विजयी झाले. तर, चांदवड तालुक्यातील दुगाव गटाच्या राष्ट्रवादीच्या सयाजी गायकवाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. काँग्रेसचे बजरंग पाटील हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष झाले. भाजपच्या अरुण इंगवले यांचा त्यांनी पराभव केला. बजरंग पाटील यांना 41 मतं, तर अरुण इंगवले याना 24 मतं मिळाली. तर, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांना 41 तर राहुल आवाडे यांना 24 मतं मिळाली.

तोलामोलाची लढाई -
जळगाव जिल्हा परिषदेत एकूण सदस्य संख्या 67 आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा 1 सदस्य अपात्र ठरलेत. त्यामुळे 65 सदस्य मतदान करणार आहेत. यात भाजप 33, राष्ट्रवादी काँग्रेस 16, काँग्रेस 4 आणि शिवसेना 14, अशी सदस्य संख्या आहे. सध्या 4 काँग्रेस सदस्यांच्या जोरावर भाजपची सत्ता आहे. आता काँग्रेस महाविकास आघडीत असल्यानं भाजपचे 33 आणि महाविकास आघडीचे 32 असा सामना असल्यानं अटीतटीची लढत होणार आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचे कालच मनोमिलन झाले. शिवाय आज देवेंद्र फडणवीस यांनीही खडसे यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता खडसे हे किंगमेकरच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा - खडसेंकडून चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप, गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण

Khadse- Mahajan | जळगावात झेडपी निवडणुकीनिमित्त खडसे-महाजनांची भेट, पाहा दोघे काय म्हणाले? | ABP Majha