पालघर : डहाणू तालुक्यातील कुणबी आणि आदिवासी समाजाची लोकवस्ती असलेल्या डोंगराच्या कुशीत आणि सूर्या नदीच्या तिरावर वसलेले निसर्गरम्य 'उर्से' गाव. ह्या गावाने 'एक गांव एक उत्सवाच्या' माध्यमातून जनतेसमोर एक आदर्श उभा केला आहे. गणेशोत्सव म्हटलं की, जिथं नजर जाईल तिथं बाप्पांचं दर्शन घडतं. मग गावागावांत असो पाड्यापाड्यांत किंवा गल्लोगल्ली. जिथं-तिथं घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचे गणपती दिसून येतात. त्यात आता कोरोनाचं सावट. तरी या कोरोनाच्या सावटाखाली पालघर जिल्ह्यात घरोघरी दीड, अडीच आणि पाच दिवसांचा तर सार्वजनिक गणेश मंडळामध्ये पाच, सात आणि अकरा दिवसांसाठी बाप्पांची स्थापना झाली. मात्र, एक गाव एक गणपती सारखी संकल्पना क्वचितचं ठिकाणी दिसून येते. अशीच एक गाव एक गणपतीची संकल्पना पालघर जिल्ह्यातल्या एका गावानं गेल्या 49 वर्षांपासून अविरतपणे सुरू ठेवली आहे.


गेल्या 49 वर्षांपासून उर्से गावातील सर्व समाजाचे महिला, पुरुष आणि अबालवृद्ध एकत्र येवून सार्वजनिक गणेशोस्तव, सार्वजनिक गौरी उस्तव, नवरात्रोउत्सव, गोपाळकाला यासह सर्व सण एकत्र एवून आनंदाने साजरे करत आहेत. यंदाचे 49 वे वर्ष असून ह्या गावाची लोकसंख्या 2500 च्या आसपास आहे. दरवर्षी गणपती व गौरी उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व खेळांचे आयोजन केले जाते. ह्या गावाला आध्यात्मिक परिवाराची शिकवण आहे. हाच आदर्श ह्या गावानं जोपासला आहे. 


कोणत्याही घरी घरगुती गणपती बसविला जात नाही. म्हणून संपूर्ण गाव एकाच ठिकाणी एकत्र येऊन सर्व उत्सव साजरे करतात. मात्र, जगावर आलेल्या कोरोना संकटामुळे या सर्व कार्यक्रमास गावकऱ्यांनी स्थगिती दिली आहे. यंदाही कोरोनाचे सर्व नियमांचे काटेकोर पालन साधेपणाने बाप्पाला विराजमान करण्यात आले. विशेष म्हणजे गावातील तरुण एकत्र येवून डेकोरेशन आणि आरास तयार करत असतात. येथे बनविण्यात येणारी आरासही इको फ्रेंडली असते. ह्या वर्षी कोरोना योध्ये आणि कोरोनावर मात करणारा देखावा तयार करून बाप्पांला विराजमान केलं आहे.


      
विशेष म्हणजे ह्या गावामध्ये तीन मंडळे कार्यरत असून कोणत्याही प्रकारची देणगी गावाच्या बाहेरून स्वीकारली जात नाही. सर्व आर्थिक बाब ही गावकरीच गोळा करतात. या गावाने एक आपले स्वतःचे भव्य सभागृह कोणतीही देणगी न घेता उभे केले आहे. सर्व कामेही श्रमदनातून केली जातात. ह्या गावाची परंपरा अशी की गणपती आणि गौरी विसर्जनानंतर शिल्लक राहिलेल्या सर्व वस्तूंचा लिलाव केला जातो. भगवंता वरचा भाव म्हणून गावकरी सर्व वस्तू चढ्या भावाने आनंदाने खरेदी करतात. ह्या मधून उरलेले पैसे गरजवंत, शेतकऱ्यांना व्याजाने वाटप केले जाते. पुढील वर्षी ह्याच पैश्यातून हे सण साजरे करतात. दरवर्षी नवीन मंडळाचे पदाधिकारी बिनविरोध निवडले जातात.