अमरावती : जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख आणि उत्तरा जगताप यांना ईडीकडून नुकतीच नोटीस मिळाली आहे. त्यामुळे अमरावतीतील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या संदर्भात भाजप आमदार प्रताप अडसड यांनी जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे ईडीच्या नोटीसमुळे पुन्हा एकदा जिल्हा मध्यवर्ती बँक चर्चेत आली आहे.


ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक ईडीच्या रडारवर आली आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आर्थिक अनियमितता झाल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर याप्रकरणी आता ईडीने बँकेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे अमरावती जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख आणि काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या पत्नी, माजी अध्यक्ष उत्तरा जगताप यांना ईडीने नोटीस बजावत ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे याच जिल्हा बँकेची निवडणूक 4 ऑक्टोबर रोजी होत आहे, असं असताना या ईडीच्या नोटीसने काँग्रेस पक्षाची कोंडी झाली आहे. 


निवडणुकीच्या तोंडावर ईडीने एन्ट्री
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता झाली होती. यानंतर ईडीने संपूर्ण व्यवहाराची माहिती मागवली असून अमरावतीचे जिल्हा उपनिबंधकांना ईडीने पत्र पाठवत मुंबई ईडी कार्यालयात बँकेचा लेखापरिषण अहवाल मागवीला होता. त्यानंतर बँकेच्या दोन्ही अध्यक्षांना ईडीने नोटीस पाठवली आणि हजर राहण्याचे सांगण्यात आहे.


काय प्रकरण आहे?
अमरावती जिल्हा बँकेने एका खासगी कंपनीत 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यात दलाली पोटी 3.39 कोटी रुपये देण्यात आले. ही गुंतवणूक थेट बँकेकडून झाली असताना दलाली देणे बंधनकारक नव्हते. त्यामुळे बँकेची 3.39 कोटींनी फसवणूक झाली अशी तक्रार बँकेचे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी 15 जून रोजी अमरावती शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि सहा दलाल अशा एकूण 11 जणांवर फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात आता ईडीने बँकेचे माजी अध्यक्ष बबलु उर्फ अनिरुद्ध देशमुख आणि उत्तरा जगताप यांना समन्स बजावले आणि विना विलंब ईडी कार्यालयात हजर राहण्याच सांगितले तर पुढील महिन्यात जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे. यात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ईडीच्या एन्ट्रीने खळबळ उडाली. ही जिल्हा बँक तब्बल 11 वर्ष काँग्रेसच्या ताब्यात होती.


या प्रकरणाशी संचालकांचा संबंध नाही : बबलू देशमुख
जी 3 कोटी 39 लाख रुपयांची अनियमितता झाली त्यात संचालक मंडळाचं काहीही देणं घेणं नाही. संचालकांना फक्त निवडणुकीपर्यंत नोटिसा द्यायच्या आणि ईडीचा ससेमिरा लावायचा हेच विरोधक करताय. पण काहीही फरक पडणार नाही. ईडी काय कोणतीही चौकशी केली तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. बँकेची चारवेळा चौकशी झाली, ज्यात काहीही निघालं नाही, आता काय निघणार? काही झालच नाही तर निघणार काय अशी प्रतिक्रिया माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिली.